Saturday, December 24, 2016

एकटा जीव

एकटा जीव

दादा कोंडके यांचं हे प्रांजळ आत्मचरित्र कधी वाचेन असं खरंच वाटलं नव्हतं. त्यांचे चित्रपट म्हणजे फक्त निर्बुद्ध ,द्वयर्थी संवाद युक्त, सुमार अभिनय-गाणी असलेले असं माझं मत होतं. चित्रपटाबद्दल मतपरिवर्तन व्हावं असं काही घडलं नसलं तरी दादा कोंडके या व्यक्तीबद्दल मात्र उगाच मन कलुषित झालं होतं , “ जसे ते ,तसेच त्यांचे चित्रपट,” या ठाम गैरसमजुतीमुळे त्यांच्या विषयी काहीही वाचण्याच्या भानगडीत पडले नव्हते.

‘ पन्नाशीचा भोज्या ’ हे पुस्तक पुन्हा वाचताना ,दादांच्या प्रकरणाशी थबकले.वाटलं , अभ्यंकारांचं पुस्तक मला आवडलं आणि त्यांना दादांचं , मग आपणही  ‘ एकटा जीव ‘ वाचायला हवं.

आत्मचरित्रात जर काहीच अशक्यप्राय , धक्कादायक नसेल तर ते बोर किंवा सपक नाहीतर अप्रामाणिक ,लपवाछपवी करणारं आहे असं वाटतं. याउलट काही गौप्यस्फोट असेल तर “ थापा तर नाहीत ना “ असं वाटत. आत्मचरित्र लिहिणे ही अशी तारेवरची कसरत ! पण मला असं वाटतं की आत्मचरित्र खरं की खोटं हे सांगणं कठीण -सारख्या घटनांचे पडसाद , त्यांचं interpretation प्रत्येकासाठी वेगळ असू शकतं.

Truth is never absolute, it is relative !

दादांनी आपला व्रात्य स्वभाव, गुंडगिरी ,शिक्षणातली एकूणच प्रगती याबद्दल प्रामाणिकपणे लिहिलंय,पण कुठेतरी स्वतःचे थोडेफार समर्थनही केलंय- गुंडागर्दीतुन आपल्याला पैसे कमवायचे नव्हते ,तर मिरवणे कधी मोठेपणा घेणे यासाठी हे सर्व उद्योग केले.

एका संघाच्या सामान्य सेवकापासून ते यशस्वी वगकर्त्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी . ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ अत्यंत यशस्वी लोकनाट्य -माझ्या पिढीला ते मूळ संचात पाहता आलं नाही हे आमचे दुर्दैव . अत्यन्त हजरजबाबी,आणि पोट धरून हसायला लावणारे चुरचुरीत संवाद ज्यात चालू घडामोडींवर भाष्य असे -त्यामुळे प्रत्येक प्रयोग नवा वाटे. ३-४ तास चालणारे प्रयोग म्हणजे कलाकारांची जणू परीक्षाच !

त्यांचा बावळट,अजागळ ,लोम्बती नाडीवाली अर्धी विजार घातलेला अवतार चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यांच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांनी चांगली कमाई केली.दादांच्या मते शहरातले उच्चभ्रू लोक जरी त्यांच्या सिनेमाला नावं ठेवत असले तरी गुपचूप अंधारात हसत.ग्रामीण भागात त्यांचे सिनेमा खूपच लोकप्रिय होते.दादा म्हणतात, माझे चित्रपट चालले कारण त्या बावळट नायकात लोकांना आपले प्रतिबिंब दिसे ….

या व्यवसायात राहूनही पूर्णपणे निर्व्यसनी असा माणूस मिळणे दुर्मिळ -दादा तसेच होते.त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती ,काही वेळा धक्कादायक (आशा भोसले), तर काही वेळा काहीशी अपेक्षित (उषा चव्हाण). मंगेशकर भगिनींबद्दलचे त्यांचे विचार खरे असतील असं वाटल्याशिवाय राहवत नाही.यातले सर्वात मनोरंजक प्रकरण म्हणजे ‘ शेणसार बोर्ड’  - जे दादांच्याच शब्दांत वाचायला हवे.

आयुष्याच्या शेवटी सर्व काही असूनही ते एकटे होते. त्यांची खंत,दुःख, एकटेपणा जाणवतो. ”पुढल्या जन्मी पैसे,मन,सन्मान नको ,पण प्रेमाची माणसे दे” - या पुस्तकाचे नाव सार्थक ठरवणारे दादांचे मनोगत.

या पुस्तकाचे शब्दांकन अनिता पाध्ये यांनी केलंय. यात कुठेही त्यांचा आवाज ऐकू येत नाही, दादांचं जाणवतात,यातच त्यांच्यातल्या लेखिकेचे यश आहे.

Friday, December 2, 2016

शब्द -२

मी का लिहिते -

अजून मला कळलं नाही….

खरंच मला काही सांगायचंय -

की आपलं उगाच ….

आणि सांगायचंय तरी काय ?

गोष्टी … त्या मला येत नाहीत

शोधते आहे एक कल्पना ….

काही पात्र ….

माझी अशी ….

माझ्या मनात जन्मून ,

फक्त माझच ऐकतील -

मला वाटेल तसं जगतील ...

मी सांगू तसं वागतील …

नाहीतर सरळ निघून जातील -

गोष्टीतून , जगातून ….

कधी चार उपदेशाचे गोष्टी-

सांगून शहाण करावं लोकांना ?

छे! कसलं कप्पाळाचं तत्वज्ञान ?

उगाच नसता आवेश-

उसना आणलेला आव ...

खरं तर मला पक्कं कळलंय-

हे सारे फक्त शब्दांचे बुडबुडे

जीव नसलेले ,

असण्याचा आव आणू पाहणारे ….

मग बंद करावं का लिहिणं ?

निरुद्देश , अनाकलनीय भ्रमंती …

शब्दांच्या प्रदेशातली ….

सारं कसं शांत होईल …

आणि सुटतील अनेक प्रश्न …

शब्दांनी निर्माण केलेले -

आणि मिळतील उत्तरे -

दोन शब्दांच्या मध्ये

किंवा शब्दांच्या पल्याड …

Monday, November 28, 2016

शब्द

शब्द…. शब्द ...

शब्दांचा पाऊस….

गुदमरावणारा….

कशासाठी ?

मी लिहिते कशासाठी ?

तू वाचतोस कशासाठी ?

तू बोलतोस कशासाठी ?

मी ऐकते कशासाठी ?

नको ...नकोच सांगूस ….

कारण पुन्हा येतील शब्दच...

चोहो बाजूनी घेरत...

इतर सर्व अर्थ पुसत...

मनातल्या विचारांचा धागा तोडत...

पण मनातले विचार ?

तेही शब्दच-

आणि सुंदर कल्पना ?

त्याही शब्दच -

अगदी अमूर्त असल्या तरीही...

मग शब्दशिवाय काहीच नाही ?

काही तलम,अस्पर्श असे ..

जे तुझ्या माझ्यात आहे …

ते काय आहे ?

शब्दांत न मावणारे ?

की शब्दांच्या पलीकडले ?


Monday, October 24, 2016

हर फियरफुल सीमेट्री

हर फियरफुल सीमेट्री

हल्ली कादंबऱ्या कथा वाचायला थोडा कंटाळाच येतो , अगदी माझ्या आवडत्या  रहस्यकथाही ... काही दिवसांपूर्वी लायब्ररीत एका ‘चीन’ वर लिहिलेल्या पुस्तकाच्या शोधात फेरी मारताना हे पुस्तक हातात पडलं…

खरं तर हे पुस्तक अगदी उत्कृष्ट,जरूर वाचावे या पठडीत बसत नाही. पण तरीही काही इंटरेस्टिंग आयडिया आणि वेगवान कथानक यामुळे रंजक नक्कीच आहे...हे पुस्तक वाचताना मनात सहज आलेले काही विचार ….

लेखिका Audrey Niffenegger हिचे याआधीच पुस्तक अत्यंत सुंदर होते , थोडी फँटसी, एक उत्कट प्रेमकथा , आणि शोकांतिका म्हणावी की सुखांतीका असा विचार करायला लावणारी भन्नाट कल्पना होती ( The timekeeper’s wife)

या पुस्तकातही एक फँटसीचा एलिमेंट आहेच. पण त्याबरोबर मुख्य कथानकात सुंदर नात्यांची हळुवार उलगड आहे….

यातली पात्रही अगदी रंगीबेरंगी ,वैविध्यपूर्ण… आणि त्यांचे व्यवसायही नाविन्यपूर्ण...कुणी RJ आहे , कुणी Highgate सिमेटेरी ,लंडनचा Tour Guide आहे , एक क्रॉसवर्ड निर्माण करतो , तर आपल्या नायिका ‘ are simply not interested in education or jobs ‘...वाटतं की ह्यातल्या प्रत्येकाचा थोडा अंश माझ्यात आहे...Marijke जी  नव्या आयुष्याच्या शोधात घर सोडले … तिचा नवरा मार्टिन जो स्वतःच्या भवती एक कोष विणून त्यातच राहू पाहतोय , रॉबर्ट ,उत्कट प्रेम आणि कायमचा विरह- अनुभवणारा ….

अरेरे ! फार पुढे गेले …

(‘झाडाचं भूत’ एक गोष्टीतली गोष्ट - पण अगदी वेगळीच कल्पना ...भीतीदायक आणि कुठेतरी थोडी calming सुद्धा)

तर या गोष्टीत जुळ्या बहिणीच्या दोन जोड्या आहेत...हिंदू शास्त्रांप्रमाणे , आपली जन्मवेळ आणि स्थान याप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम लिहिला जातो…(विश्वास नसला तरी ही कल्पना मला नक्कीच फेसिनॅटिंग वाटते…माझ्या ओळखीची अशीच एक जुळ्या बहिणींची जोडी आहे , ज्यांच्या आयुष्यात खरंच सर्व गोष्टी एकमेकांना समांतर घडतायत...अर्थात त्या नाट्यपूर्ण नाहीत, म्हणून सांगत नाही..)

ही गोष्ट  Highgate सिमेटेरी च्या सान्निध्यात घडते , सिमेटेरीज वातावरणनिर्मिती साठी उत्तम ! (पण आपलं भूत इथे कधीच येत नाही…) ह्यावरून आठवलं, गोव्याला माझ्या काकांच्या घराशेजारीच एक ख्रिश्चन दफनभूमी होती , कधी रात्री तिथून जावं लागलं की पाचावर धारण बसायची , अक्षरशः धावतच घर गाठायचो…

जुलिया आणि वॅलेन्टीना जुळ्या बहिणी , त्यांची आई एडी हिलाही एक जुळी बहीण आहे, पण त्यांची ही Elspeth मावशी गेली अनेक वर्षे आपल्या बहिणीपासून दुरावलेली आहे. अचानक कॅन्सर मुळे Elspeth चा मृत्यू होतो , तेव्हा तिच्या मृत्युपत्रात तिने आपलं सर्व काही आपल्या भाच्यांच्या नावे करून ठेवले आहे हे उघड होते …

इल्सपेथ मृत्यूनंतरही पंचतत्वात विलीन झालेली नाहीये , तिथेच आहे ,आपल्या घरात ,एक पुसट, अस्पष्ट अस्तित्व...एका छोट्याश्या कप्प्यात स्वतःला आखडून घेऊन राहणारं , आणि तिथे सुरक्षित वाटणारं…

नाही , ही तशी भयकथा नाही , पण ह्यातली (थोडीफार) भयनिर्मिती ही खरं तर स्वार्थी मनुष्य स्वभावामुळेच झालीये….

अर्ध पुस्तक झाल्यावर मला आठवलं- हे पुस्तक मी आधी वाचलंय , हे कप्प्यात राहणारं आणि दिवसेंदिवस थोडा आकार आणि शक्ती मिळवणार भूत ओळखीचं आहे की ! आणि त्यातला मांजराचं पिल्लूही - जे अजाणतेपणे माणसांच्या आणि भूतांच्याही मनात भलत्याच कल्पना घालू पाहतंय….

पुस्तक मनोरंजक आहे , पण अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाही , इल्सपेथ भूत का झाली आणि ती आपल्या घरातच का अडकून राहिली , तसेच एडी आणि इल्सपेथ या बहिणीचं तकलादू रहस्य व त्या मागची कारणमीमांसा दोन्हीही गोष्टी पटत नाहीत , आणि त्यांची चलाखी पकडली गेली नाही हे तर बिलकुलच ….

हाँ , इथे लेखिकेने जी शक्कल लढवलीये, तिला दाद द्यायलाच हवी ….ज्या प्रश्नांची उत्तरं तिला सुचली नाहीत ते सारे प्रश्न तिने आपल्या पात्रांच्या तोंडी दिलेत ….आणि अर्थातच त्यांनाही त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत….

असो , थोडक्यात विश्लेषण - “मनोरंजक पण पुन्हा वाचण्याजोगे नाही ….”

Friday, October 14, 2016

पहिली पायरी

हल्ली काही दिवसांपासून पुस्तकांवर लिहिलेली पुस्तकं वाचायचा सपाटा लावलाय , अर्थात इंग्रजीमध्ये !

बऱ्याच पुस्तकांमध्ये एक लेख जरूर असतो , लेखकाच्या लहानपणातील वाचनानुभवाबद्दल .

पण ह्या लेखकांच्या आणि आपल्या ...खरं तर माझ्या , बालपणीच्या लेखनविश्वात बराच फरक आहे ….

या सर्व लेखकांत एक गोष्ट समान आढळते , या सर्वांना त्यांनी वाचायला कधी आणि कुठे सुरवात केली ते लख्ख आठवतं , मला मात्र मी थेट मोठ्या अक्षरातली पुस्तकं वाचू लागले त्या आधीचं काहीच आठवत नाही , ( नाही म्हणायला इंग्रजी अक्षर ओळख चांगलीच आठवते - चौथीच्या वर्गात असताना ,माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला मी a b c d लिहून दाखवलं आणि  फुशारक्याही मारत होते !)

माझ्या आयुष्यात एनिड ब्लायटन आणि तत्सम इतर लेखक कधी आलेच नाहीत , माझं लहानपण फक्त मराठी पुस्तकांनी भरलेलं आणि भारलेलं होतं. लायब्ररीपेक्षा पुस्तकं विकत घेऊन जास्त वाचायचे. माझे आजोबा दर सुट्टीत मला १५-२० पुस्तकं घेऊन द्यायचे , त्यांची अखंड पारायणं चालू असायची .

जादूचा घोडा , उडणारा गालिचासारखी साहित्याच्या वर्गवारीत ना बसणारी पुस्तकं आता लक्षातही नाहीत. पण तीसुद्धा सतत वाचायला आवडायची .

भा.रा.भागवत आणि लीलावती भागवतांची अनेक अत्यंत रंजक पुस्तकं वाचली , अर्थात त्यातली बरीच भाषांतरित होती हे नंतर कळलं, पण भा. रां. चा मानसपुत्र फास्टर फेणे आम्हा सर्वांचाच हिरो होता. त्यांचा दुसरा मानसपुत्र बिपीन बुकलवार मात्र काहीसा अप्रसिद्ध . हा बिपिनदादा कधी ओरिजिनल तर कधी गाजलेल्या लेखकांच्या गोष्टी सांगे. एका दिवाळी अंकात आलेली ‘घड्याळाचे गुपित’ मला काही वर्षांपूर्वी मॅजेस्टिक प्रदर्शनात मिळाली - जुना मित्र खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद मिळाला .

दिवाळी अंक - मुलांचे- माझ्या वाचन विश्वाचा महत्वाचा घटक होते. त्यावेळचे दिवाळी अंक balanced म्हणावे असे होते - म्हणजे कविता, गोष्टी,लेख अगदी मुलांना आवडतील अशा प्रमाणात ! मनोरंजन हे आपले काम आहे हे ते अंक कधीही विसरले नाहीत - मागे माझ्या मुलासाठी मी काही दिवाळी अंक चाळले , ते फक्त माहितीपूर्ण लेखांनी भरले होते!

वर्षभर ना मिळणाऱ्या दोन गोष्टी - फराळ आणि दिवाळी अंक माझी दिवाळी खास बनवायचे -आता ह्या दोन्ही गमती संपल्या , ही खंत वाटत राहते ….

काही ओरिजिनल पुस्तकं आठवतायत , ह्यांचे लेखक अप्रसिद्ध … एक होतं ‘गोष्टींची दुलई ‘ - ह्या पुस्तकातल्या २-३ गोष्टी अजूनही आठवतायत - ‘ राजुची डायरी ‘ नावाची गोष्ट  माझी आवडती --राजू नावाच्या काहीश्या एकलकोंड्या मुलाला सांताक्लाउस भेटतो - दरवर्षी एक याप्रमाणे अनेक रंगीबेरंगी डायऱ्या देतो - आणि राजू त्या आपल्या रंगीबेरंगी अनुभवांनी भरून टाकतो - दरवर्षी काही नवं शिकून डायरी भरून टाकण्याची कल्पना मला फारच आवडली होती ! त्यात एक ‘ दुलदुलची गोष्ट ‘ या नावांनीही कथा मला फार आवडे. दुलदुलचं नाक नकट होतं ही गोष्ट दुलदुलला इतकी त्रास देई की त्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी होती - तिच्या प्रयत्नांना कसे यश येते आणि त्यातून काय गमतीजमती होतात यांची मजेशीर गोष्ट सांगितली होती.

आणि एक मजेशीर गोष्ट - पुस्तक अगदी प्रस्तावनेपासून वाचायचं हा माझा खाक्या - ‘अरगडे ,कुलकर्णी आणि मंडळी हे नाव तुमच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहे ‘ ही काही  प्रस्तावनांची सुरुवात आठवतेय ,म्हणजे ह्या प्रकाशकांची खरं तर बरीच पुस्तकं असावीत ,- कुणी ‘अ ,कु आणि मं ‘ आपल्यासाठी पुस्तकं काढतायत हे वाचून खूप बरं वाटलं होतं!(अ कु मं च्या पुस्तकात पर्वतीच्या पोटात दडलेलं एक  भुयार आणि पेशवेकालीन गुप्त कागदपत्र होते...)

इतर अनेक भाषांतरित पुस्तकं मी वाचली - टारझन(ग. रा. टिकेकर) , हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( सुमती पायगावकर), अरेबियन नाईट्स .गुलबकावली ,वेताळ पंचविशीसारखी सदाबहार पुस्तकं सुद्धा .’साने गुरुजींच्या गोड गोष्टी ‘मध्येही बऱ्याच भाषांतरित गोष्टी होत्या ( म्हणजे मराठी बालवाङ्मय फार कमी ओरिजिनल आहे ?त्यावेळी अर्थात या गोष्टीमुळे काहीही फरक पडायचा नाही म्हणा ...)

मग सातवी आठवीत कधी तरी गोनिदा , पु. ल.,भेटले ...स्वामी ,मृत्युंजय ,राजा शिवछत्रपती, वीरधवल यांची पारायणे सुरु झाली ...

ही मोठ्यांच्या पुस्तकविश्वातल्या दीर्घ सफरीची सुरुवात होती ….

बॉम्बे टॉकीज

मध्यंतरी एक थोडे क्लिष्ट पुस्तक वाचत होते . खरं तर ते नीट समजत नव्हतं , पण “कसं समजत नाही ते बघते “ अशा हट्टाला पेटून ते बाजूलाही ठेववत नव्हतं….

मग अधूनमधून, फक्त येता जाता तोंडात टाकावं , तसं एक हलकं फुलक पुस्तकही वाचत होते….बाबू मोशाय यांनी लिहिलेल ‘बॉम्बे टॉकीज ‘. बाबू मोशाय हे नाव चित्रपट लेखनासाठी नवं नाही , पण बाबू मोशाय म्हणजे कोण हे या निमित्ताने मला प्रथमच समजलं…( ते रहस्य मी उघड करणार नाहीये …)

खरं तर हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण आहे , रंजकही आहे पण त्यात संपादनाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो ...एखाद्या विषयावर chronologically , मुद्देसूद लिहिलं नसून , सहज येत जाता गप्पा माराव्यात तसं लिहिलंय , परिणामी विषयांतर-इथून तिथे मारलेल्या उडया -विखुरलेलं लिखाण  ,जणू कुणी आपली रोजनिशी मनात येणाऱ्या सर्व विचारांसकट जशीच्या तशी छापली आहे ….

पण तरीही लेखकाचा सिनेमाचा अभ्यास , प्रेम मात्र पुरेपूर जाणवते - उदा.“ कहा गये वो लोग “ हा पाकिस्तानात निघून गेलेल्या चित्रपट कलाकारांविषयी लिहिलेला लेख .....

तसेच देव आनंद वर लिहिलेला लेख , माहितीपूर्ण असूनही मोठे असल्याने गुणापेक्षा दोषांमुळेच लक्षात राहतात .

याउलट असीत सेन वरचा छोटेखानी लेख - यात मात्र विषयांतराला फार वाव नसल्याने वाचनीय झाला आहे . काहीश्या अप्रसिद्ध पण सुरेल गाणी असणाऱ्या चित्रपटांचे सेन दिग्दर्शक होते -(इथे माझ्या मनातील एक गोंधळ दूर झाला - मी असित सेन हे हास्य अभिनेते आहेत असं समजत होते- आता कळलं की दोन असित सेन आहेत.) अन्नदाता , अनोखा दान तसेच गाजलेल्या सफर,खामोशी ,ममता या चित्रपटांचेही. खामोशीमधील गाण्याबद्दल लेखक म्हणतो “ वो शाम आणि तुम पुकारलो या दोन्ही गाण्यात एक प्रकारची खामोशी जाणवते ! “गुलझारचे अप्रतिम शब्द असलेली ही गाणी नक्कीच पुन्हा ऐकायला हवीत ( पण माझा आवडतं गाणं मात्र ‘हमने देखी है’ - “ हाथ से छुके इसे रिशते का इलजाम ना दो “ सुंदर ओळ !)

“जिन्हे नाझ है हिंद पार वो कहा है “सारखा लेख मदर इंडिया वर सुरु होतो , अनेक वेळा मनोजकुमारला स्पर्श करत हल्लीच्या चित्रपटांवर येऊन थांबतो . रंजक पण विस्कळीत .

मृणाल सेनवर लिहिलेला लेख छोटा आणि सुबक - आता माझ्याकडे भविष्यकाळात पाहण्याच्या चित्रपटांची एक यादीच तयार झाली आहे …

थोडक्यात काय तर जर संयम बाळगला तर हे पुस्तक नक्कीच काही छान आणून जाते ….

Sunday, September 18, 2016

पुनर्वाचन

पुन्हा एकदा तेच पुस्तक वाचायचं ही कल्पनाही मला काही वर्षांपूर्वी आवडली नसती.मी ‘वाचा आणि पुढे चला ‘या पंथातली .”काहीही नवीन गोष्ट वाचायला मिळत नाही , नवीन शिकायला मिळत नाही ,कसलीही नवी विचारधारा सापडत नाही आणि कादंबरीचा शेवट व्यवस्थित आठवतोय …. मग का पुन्हा वाचू ? “ असे माझे विचार होते….

पण लख्ख आठवतंय - लहानपणी अशी नव्हते . किंबहुना लहानपणी सर्वच,  स्वतःकडची बरीच पुस्तकं पुनःपुन्हा वाचतात …. माझ्याजवळ असलेली फास्टर फेणे , टारझन , शेरलॉक होम्स ,हॅन्स अँडरसनच्या परीकथा अशा अनेक पुस्तकांची मीही सतत पारायणे करी….

पण मोठम खोटं वयात, ही सवय मागे पडली …

मागे ,आईच्या घरी गेले ,तेव्हा तिथली माझी काही आवडती पुस्तकं घेऊन आले . त्यातच ‘आहे मनोहर तरी ‘ पुन्हा एकदा भेटलं….

याचं पहिलं वाचन वयाच्या २५-२६ व्या वर्षी केलंय , जेव्हा आयुष्य साधं ,सरळ ,सरधोपट होतं , फक्त स्वतःच्या मर्जीनुसार जगत होते ,डोळ्यात अनेक स्वप्नं होती ,स्वतः बद्दल आशा होत्या ,प्रश्न फक्त परीक्षेत येतात आणि उत्तरं पुस्तकांत मिळतात असं वाटण्याचे ते दिवस होते.

आता ,जेव्हा अर्धं आयुष्य जागून झालंय, साधारणपणे कळलंय -आयुष्य आपल्याला कुठे नेतय, असच सुमार,सामान्य पण आरामाचं आयुष्य आपण जगत राहणार हेही जाणवतंय ….किंबहुना त्याहून अधिक आपण आयुष्याकडून काहीच मागत नाही अशा परिस्थितीत हे पुस्तक वेगळं वाटेल का ?

आपण कुणीही ग्रेट नाही , आयुष्याकडून अवाजवी अपेक्षाही नाहीत , असलच काही टॅलेंट तरी सरधोपट सुखासीन जगता यावं यासाठी आपण स्वतःला वेगळ्या मार्गावरून चालूच दिलं नाही हा विचारही आता मनात येत नाही ….

सुनीताबाई पु. ल. च्या सावलीत स्वतःचे गुण विकसित करण्याच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करत राहिल्या ,त्यात मी स्वतःला शोधू पाहतेय का ...निष्क्रियतेला एखादे उदात्त नाव देऊ पाहतेय का ….

आता या प्रश्नांची उत्तरे पुनर्वाचनानंतरच ….

झपूर्झा

माझं इंग्रजी वाचन तसं भरपूर पण तरीही मनात एक खंत आहेच ….ज्याला classics म्हणतात अशी पुस्तकं मी जवळजवळ वाचलीच नाहीत . खरं तर खंत असूनही, त्यावर उपाय म्हणूनही मी  classics च्या वाटेल जाणे कठीण..... अशा वेळेला ,अच्युत गोडबोलेचं "झपूर्झा भाग १ आणि २ "अगदी मदतीला धावुन आल्यासारखं वाटलं .

अनेक उत्तमोत्तम इंग्रजी लेखक, ज्यांची मूळ पुस्तके आपल्याला समजणे कठीण.....खरं तर आपण घाबरून त्यांच्या वाटेलाच जाणार नाही ,असे लेखक आणि त्यांची गाजलेली पुस्तके याबद्दल सोप्या , सुटसुटीत भाषेत ,सुरेख लेख या पुस्तकात आहेत ....अगदी शेक्सपियरपासून ते मार्केझ पर्यंत अनेक लेखक यात आपल्याला भेटतात....

यातील प्रत्येक लेखकाचे काही वैशिष्ठय आहे , एक वेगळी  शैली आहे . कित्येकांकडे एखाद्या गाजलेल्या नव्या लेखनप्रकाराच्या उगमाचे श्रेय आहे  - जसे मार्केझकडे magical realism ....

अनेकदा प्रस्थापित लेखनशैली किंवा contents याविरुद्ध जाऊन , प्रचंड विरोध , कधी लोकक्षोभ यांना ना जुमानता ,हे सर्व लेखक स्वतःच्या लिखाणाशी प्रामाणिक राहिले....

ओनोरे बालझाकसारखा लेखक ,प्रचंड लेखन करी . वाटतं इतकी energy , कल्पनाशक्ती कुठून आणत असेल….

त्याउलट फ्रांझ काफ्का - ज्याला स्वतःच्या लेखनाबद्दल कधीच विश्वास वाटला नाही ,आपलं सर्व लिखाण आपल्या मरणानंतर जाळून टाकावे अशी विनंती त्याने आपल्या मित्राला केली होती .....

हेमिंगवेसारखा भन्नाट जगलेला माणूस तितक्याच भन्नाट रित्या मृत्यूच्या बाहुपाशात गेला ...

आणि शेक्सपियर ? ....उत्कृष्ट , खर तर आद्य नाटककार ,त्याची भाषा समजायला कठीण , विशेषतः माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्यांसाठी ....पण माझा 15 वर्षांच्या लेकाला त्याने भुरळ घातलीये . त्याच्या merchant of व्हेनिस नाटकातले संवाद तो धडाधड म्हणत असतो .... मॉडर्न मुलांना ,एक 18 व्या शतकातला लेखक प्रभावित करू शकतो यातच त्यांचं यश आल , नाही का ! त्याची गुंतागुंतीची कथानकं , उपकथानकं संवाद ,पात्ररचना यासाठी तो प्रसिद्ध आहे .

मी वाचलेले क्लासिक म्हणावेत असे लेखक मोजकेच - टॉल्स्टॉयची ऍना कारेनिना वाचली आहे , पण तिची घालमेल आपली वाटली नाही , त्यातली लांबलचक स्वगत आणि वर्णनं त्यातल्या narrative मध्ये बाधा आणतात असा मला वाटलं .

मार्केझ चा 100 इअर्स ऑफ सोलीट्युड खरं तर मला समजलीच नाही....

ब्रदर्स कारामझोव , मॅडम बोवारी , लेडी चॅटर्लीज लवर ह्या कादंबऱ्या वाचायचा फक्त निष्फळ प्रयत्न माझ्या पदरात आहे ! बहुधा जुनी पसरट लेखनशैली,कठीण इंग्रजी , आपलेसे न करू शकलेले dilemma यामुळे बहुधा …

आर्थर कॉनन डॉयल , ऑस्कर वाइल्ड यांची पुस्तकं मात्र फार आवडली , तसेच ब्रॉंटे भगिनींचीही ! आणि हो , बर्नार्ड शॉ चा Pygmalion ही अतिशय आवडतं !

या पुस्तकात नाहीत तरीही आवडते असे माझे अजूनही काही लेखक आहेत सोमरसेट मॉम ,एमिल झोला आणि सदा लोकप्रिय - अगाथा christie आणि वूडहाऊस.

हे दोन्ही भाग अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण आहेत - लेखकांची थोडक्यात चरित्र , त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांबद्दल माहिती तसेच थोडक्यात त्या पुस्तकाची कथा असं साधारण यातील लेखाचं स्वरूप आहे.
भाग 2 मध्ये काही कवी ,तसाच नाटककारही समाविष्ट आहेत .(Ezra पाउंड , आर्थर मिलर,एलिझाबेथ आणि रॉबर्ट ब्राउनिंग)

कधीकधी आपण जाणून असतो की आपण एखाद्या स्वप्नवत प्रदेशात फक्त vicariously जाऊ शकतो , दुसऱ्याच्या मार्फत - कोणाच्या शब्दांतून किंवा दृश्यनुभवातून .... हे पुस्तक माझ्यासाठी अगदी तसंच ...... कल्पनेपलिकडील प्रदेशातील भ्रमंती जणू !

Monday, September 12, 2016

फुरसत के रात दिन

खुप वर्षं एखादं गाणं मनात रुंजी घालत असतं ,पण अचानक एके दिवशी अनपेक्षित रित्या नव्याने भेटायला येतं…..तेच तेच वाचून लिहून कंटाळलेल्या मनाला  तरतरी देतं…
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
( खूप वर्षं हे तसव्वूर -ए - जाना प्रकरण मला कळलंच नव्हतं … बैठे रहे तसव्वूरे , जाना किये  हुए असं समजत होते ...
जाना करत बसण म्हणजे काय असाही विचार वारंवार मनात यायचा ….आज केवळ गूगल देवीमुळे खरे शब्द समजले .)
खूप पूर्वीपासून हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे .( अगदी चुकीच्या शब्दासकट !) लताबाईंचा सुरवातीचा आलाप मनाला एक हुरहुर लावतो ….आपल्याकडची सर्वात मौल्यवान गोष्ट आपल्या नकळत हरवलीये आणि कितीही प्रयत्न केला तरीही परत मिळणार नाहीये ….
गाण्याचा अर्थ असाच आहे पण अर्थ समजण्याआधीपासूनच मला अशी हरवल्याची भावना जाणवे ….
तसही आपण सर्व ‘फुरसत के रात दिन ‘शोधतच आहोत ….जेव्हा घड्याळाच्या काटयाबरोबर ना धावता काही क्षण स्वतःशी संवाद साधू …. ‘तसव्वूर -ए - जाना’ ...आपल्या प्रिय व्यक्ती / छंद/ परमात्मा यांच्या ध्यानात हरवून जाऊ ...
(तसव्वूर - imagination , contemplation
जाना- प्रिय व्यक्ती - मी थोड्या broad अर्थाने म्हणतेय .)
या गाण्याची दोन versions सर्वश्रुत आहेत . पैकी duet थोड्या आनंदी वळणाच … संजीव - शर्मिला प्रेमी युगुलावर चित्रित झालेलं ...पण दुःखी version अधिक समर्पक ….त्या प्रेमींचे असे काय हरवलंय ….त्यांचे तर खेळण्याबागडण्याचे , झाडांभोवती फिरण्याचे दिवस ….पण या युगुलाच्या मागून फ्रेम मध्ये डोकावणारा वयस्क संजीव ‘ वादी में गुंजती हुई खामोशिया ‘ ऐकतो ….सुंदर ! भूपेंद्र च्या धीरगंभीर आवाजातील slow version अतिशय सुरेख .
गूगल देवीकडून या गाण्यावरील एका छोटासा वाद समजला .
हा मूळ शेर गालिबचा. त्या मूळ शेरात स्वल्पविराम वापरून ओळ कुठे तोडलीये हा तो मुद्दा ….
एक version मी वर दिलेले …
तर दुसरे ….
दिल ढुढंता है फिर वोही फुरसत ...
के रात दिन बैठे रहे तसव्वूर -ए - जाना किये हुए….
हे दुसरं version रचनेच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण वाटतं खरं पण ते बहुधा शेर या प्रकारच्या ‘मीटर’ मध्ये बसत नसावं ...मला आपल प्रचलित version च योग्य वाटतं …
असो. मी ह्यातली तज्ज्ञ नाही … मी फक्त कानसेन ….आणि लता-मदन  फुरसत मिळाली की ऐकणारी … अगदी रात दिन ...

हा एक intersting video आहे , मदनमोहन यांनी ज्या अनेक चाली ह्या गाण्यासाठी बनवल्या होत्या त्यांबद्दल....पहा तुम्हाला कोणती आवडते....

त्यातील आशाताई आणि गुलझारची टिप्पणी तर...वाह वा !






Saturday, July 16, 2016

अमलताश

खरं तर हे पुस्तक पाहीले तेव्हापासूनच ह्याबद्दल उत्सुकता होती.....
१.अमलताश म्हणजे काय ? ( एक पिवळ्या फुलांच झाड , आणि लेखिकेच्या कराडमधल्या घराचं नाव . या पुस्तकाचं मुखपृष्ठही अमलताशचच ! पिवळधम्मक ! )
२.मौज प्रकाशन...म्हणजे नक्कीच वाचनीय !
३.प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं मला फार आवडतात ....त्यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल काहीतरी वाचायला मिळेल ...लंपन ह्या त्यांच्या मानसपुत्राची जन्मकथा वगैरे.....
४.लेखक पत्नींची आत्मचरित्रे तशीही मला वाचायला आवडतात ( त्याबद्दल थोडे पुढे सविस्तर )
आपल्याला जो लेखक पुस्तकातून भेटतो ,आपण त्याच्या लिखाणावरून , त्याच्याबद्दल काही आडाखे बांधत असतो.पण कधीकधी तो लेखक खऱ्या जीवनात फार वेगळाही असू शकतो.आपल्याला वाटतात तसे खरच संत होते का ?
५.त्यांच्या नावाच रहस्य ! ( सुप्रिया भालचंद्र दिक्षित ह्या प्रकाश नारायण संत ह्यांच्या पत्नी ! आणि संत हे इंदिरा संतांचे चिरंजीव ! )

ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याआधी या पुस्तकाच्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार....

एखाद्या आत्मचरीत्राबद्दल लिहिताना मला नेहमी वाटतं , मी कोणाबद्दल लिहितेय....पुस्तकावर की त्या व्यक्तीवर ?
कोणी एखादी व्यक्ती आपला आयुष्य आपल्यापरीने जगतेय ...लढतेय...आणि तुम्हाला त्याबद्दल सांगू पाहतेय , म्हणून आपण त्यावर काही भाष्य करावे का ?  खरं तर आपलं आयुष्य मोकळेपणे मांडायला धैर्य लागतं ,मग खरं तर प्रत्येक आत्मचरित्राच कौतुक व्हायला हवं....त्याने जे लिहिलंय ,तेच त्याच्या दृष्टीने घडल असेल....
आणि जर आपल्याला , त्या व्यक्तीतले काही दोष जाणवले , तर ही त्या व्यक्तीच्या सच्चेपणाचीच निशाणी !

मला स्वतःला आत्मचरित्र वाचायला फार आवडतात....दैनंदिन आयुष्यातल्या अनेक छोट्या मोठ्या अडचणींपासून ते संकट म्हणाव इतक्या मोठ्या प्रसंगातून मार्ग काढत लोक आपल्या परीने जगण्यातला आनंद ,सौंदर्य  शोधत असतात ...हे सार मला खूप प्रेरणा देऊन जातं.....

याआधी अनेक लेखक पत्नींची आत्मचरित्र वाचली आहेत ...( काही राहुनही गेलीत !)
स्मृतिचित्रे...
आहे मनोहर तरी...
साथ सांगत ( रागिणी पुंडलिक)
कुणास्तव कुणीतरी ( यशोदा पाडगावकर)
रास ( सुमा करंदीकर)
नाच ग घुमा ( माधवी देसाई)

आणि आता हे ....अमलताश.....


तर अमलताशबद्दल.....
पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या बालपणीच्या घरापासून होते...इथूनच आपल्याला लेखिकेच्या जडणघडणीची  सुरुवात दिसते.काही कारणास्तव लेखिकेची आई तिच्या माहेरी परत आली , पण तिथे ती आपल्या नशिबावर रडत न बसता ,पुढे शिकून आपल्या पायावर उभा राहण्यासाठी सतत प्रयत्नशील होती. हाच गुण लेखिकेतही आपल्याला दिसतो.आयुष्यात अनेक अडचणी आल्या ,पण शिक्षणाचे महत्व समजून ते पूर्ण करण्याची जिद्द - त्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून केलेली धडपड - अनेक वेळा सासरची मंडळींशी दिलेला लढा - या सर्वांचे बीज लेखिकेच्या बालपणात -घरच्या वातावरणात आणि त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वात दिसते .

६० वर्षापूर्वीही मेडिकल कॉलेज तसेच होते- किंबहुना तीच challenges -काळामुळे  थोडी जास्तच खडतर वाट -मला क्षणभर माझे शिक्षण आठवले.....

घराच्या दबावामुळे gynaecology सारख्या विषयात मिळालेले PG सोडावे लागले .....सासू प्राचार्या  आणि कवयित्री झाली तरी ती सासुच असते - आई नाही !....

पण अनेक अडचणींवर मात करून त्या practice मात्र चालूच ठेवतात - अत्यंत प्रेरणादायी असा हा भाग !

त्यांचे लहानपणीचे फोटो -त्यातली हसरी सुधा -नंतरच्या आयुष्यात मात्र अनेक झुन्जीनंतर - हास्य हरवून -पोक्त , गंभीर आणि थोडी करारी झाल्यासारखी वाटते.....

संत आणि त्यांची प्रेमकहाणी अगदी रोमहर्षक - अगदी फिल्मी वाटावी अशी - ते भावनांचे चढउतार - आशा निराशेचा खेळ - विरह - मिलन - विरह अशी आवर्तने....लहानपणापासून ज्याला ओळखतो अशा व्यक्तीशी मैत्रीचे नकळत प्रेमात रुपांतर कसे झाले ....ह्याबद्दल फार छान लिहिले आहे....

उभयताना प्रकृतीच्या अनेक अडचणी आल्या - त्यामुळे त्या काही अंशी थकलेल्या , कंटाळलेल्या वाटतात ...संतांच्या लंपनचा  भाबडेपणा , आशावाद -जो संतांमध्ये दिसतो- तो त्यांच्यामध्ये नाही -  त्या अत्यंत practical वाटतात  -आणि ते लेखक पत्नीला आवश्यकच असावे -त्यांचे पाय जमिनीवर असायलाच हवेत .... तेव्हाच लेखक -संत - मुक्तपणे कल्पनेच्या आकाशात भरारी घेऊ शकले....

अनेक वर्षांच्या सहजीवनाचा शेवट संतांच्या अपघाती मृत्यूने झाला - मनाला खूप चटका लावून गेला - तोही अशा वेळी , जेव्हा संत लंपनच्या बाबांच्या मृत्यूचा क्षण लिहिण्याच्या तयारीत होते ....ते लिखाण संतांना थोडे जड जात होते .....कारण त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या अकाली मृत्यूची सावली सतत त्यांची भोवती असे....

संतांचे अनेक पैलू आपल्याला दिसतात ....एक रसिक - जीवनाच्या विविध अंगांचा आस्वाद घेणारा ....विविध प्रकारे जीवन कलाकृतीत आणू पाहणारा ....लेखक ,चित्रकार ,वायोलिन वादक -प्रियकर-नवरा-वडील-मातृभक्त मुलगा ....

लेखिकेचीही कर्तबगारी ,सतत असलेले प्रोत्साहन -पाठींबा - ज्याशिवाय संतांना निर्मिती सहजसाध्य झाली नसती ,कलासक्ती , सामाजिक भान ,उत्तम वैद्यकीय कौशल्य ,खंबीर ,कणखर स्वभाव -पण तरीही प्रेमळ स्वभाव -घरासाठी त्यागाची तयारी....एक स्त्री डॉक्टर म्हणून त्यांनी आलेल्या अडचणीचा केलेला सामना विशेष  कौतुकास्पद !

अनेक लेखक पत्नींच्या  मालिकेतले अजून एक आत्मचरित्र - पण ते विशेष ठरते ते लेखिकेच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे....जरूर वाचण्याजोगे !!


( सहज आठवले म्हणून .....

रविवारच्या लोकसत्तामध्ये ( १७ जुलै) आशुतोष जावडेकरांचा लेख वाचला , The Little Prince आणि त्याचा लेखक सेंट एक्झुपेरी वरचा. त्याच्याही पत्नीने आत्मचरित्र किंवा दोघांच्या सहजीवनावर पुस्तक लिहिलंय...( ते अजून वाचायचा योग आला नाहीये) पण मला वाटतं कि कदाचित The Little Prince मध्ये डोकावणारा सेंट एक्झुपेरी हा ह्या पुस्तकातल्या सेंट एक्झुपेरी पेक्षा खूप निराळा असणार एवढा नक्की ! पुस्तकातून आपल्याला भेटणारा लेखक हा प्रत्यक्ष जीवनात खूप वेगळा असू शकतो. पण मग लेखनात स्वतःचा अंश उतरतो अस का म्हणतात ? सोमरसेट मॉम हा प्रत्यक्ष जीवनात थोडा क्रूर असल्याच ऐकिवात आहे , पण त्याच्या लेखनात हे कधीच जाणवत नाही.....

...किंवा कदाचित असंही असेल....एखादी गोष्ट लिहिताना ,त्यातल्या पात्रांच्या आत , खोल अंतरंगात शिरून ,त्यांच्यासारख बनून लिहाव लागत असणार.....म्हणून आपल्याला तेच दिसतं जे लेखक दाखवू इच्छितो....)





Wednesday, April 6, 2016

पुन्हा एकदा गलका ... (यावेळी पद्य !)

फेरफटका जगात मारून
पुन्हा आले स्वतःशी.,
खरेच मजला पुन्हा कळाले ,
माझे आहे मजपाशी !

नको वाटतो गोंधळ-गलका
नकोच ती वादावादी
सतत प्रश्न ,अभिवादन नेहमी
काय अर्थ या संवादी ?

प्रत्यक्ष भेटुनी नजर भिडवूनी
चेहरा वाचत बोलावे
मोडित निघाली प्रथाच आता
दुखणे कोणा सांगावे

सतत हाती असतो तो फोन
बोटांचे जणू नृत्य चालते
शुभप्रभात आणि शुभरात्रीचा
मी उगीचच रतीब घालते

अति जाहले,मन उबगले
तक्रार सांगू कोणाला ?
तसे पाहता या सैताना
मीच नाही का जन्म दिला ?

Monday, April 4, 2016

मी काय वाचतेय.....

सध्या मी रोज एक छोटीशी पोस्ट लिहिण्याचा संकल्प केलाय , एका challenge चा भाग म्हणून. पण  ( कबुल करायला हरकत नाही की) खरं तर थोडी फसवणूकच करतेय . पुढच्या साधारण २० एक पोस्ट्स लिहून तयार आहेत माझ्या!

परिणामे मला आता उबग आला....इंग्रजी लिखाण आणि वाचनाचा ! त्यामुळे आता गाडी मराठीकडे !
आपल्याला ज्या विषयात फारसं कळत नाही अशा एका विषयाकडे मी आता वळणार आहे....खूप दिवसापासून आणून ठेवली होती ही...आजपासून श्रीगणेशा !

Saturday, March 19, 2016

कोलाहल

नको वाटतो कधी कधी हा गलका...हा आवाज ! माणूस समाजप्रिय आहे खरं पण कधी कधी त्यालाही समाज नकोसा होतोच ! आपल्या कोशात जाऊन...सर्वांपासून दूर कुठेतरी बसावं असही कधीतरी वाटतं ...एखादं कासव आपलं अंग चोरून,कवचाखाली गुपचूप दडून राहत , अगदी तसच....

अशा मनाच्या अवस्थेत सगळच कर्कश वाटतं....मनाला त्रास देतं...नको कोणाशीही बोलणं..प्रत्यक्ष  नको....social media बिलकुलच  नको , असं वाटत राहत..... निरर्थक नको... अर्थपूर्ण त्याहूनही नको ....कारण त्यानंतर आपल्या मेंदूत जो संवाद चालू होतो तो थांबवण केवळ अशक्य ! चौकश्या  नकोत...अभिवादन नको... काहीच नको.....

...काश आपण या शहरात अनोळखी असतो ,अनोळखी नजरेने,वरवर पाहून पुढे गेलो असतो .....पण इथे ,कोणी न कोणी तर भेटतच सतत....मग तेच...तोंड देखलं हसू...हालहवाल ...ख्यालीखुशाली....

शांततेची ओढ लागली असताना, कोलाहलात वावरणे , काम करणे प्रचंड तापदायक ! हा आवाज आपल्या मनाला दगड बनून खाली खेचत राहतो....कान जर बंद करता आले असते तर....

आजची माझी अवस्था याही पलीकडली...फक्त आवाजच नाही तर शब्दही नको झालेत ... पुस्तकातले ... लिखाणातले .... संगीत नको ...काहीही वाचू नये...ऐकू नये...पाहू नये .....लिखाणही शब्द बम्बाळ....फाफटपसारा वाटतंय .....निरुद्देश भ्रमंती कागदावरची....

शनिवार संध्याकाळ आहे ...हा सर्व , या पूर्ण आठवड्याच्या कामाचा शीण कदाचित .....आठवडाभर  ऐकले - बोलले - वाचलेले हजारो- लाखो शब्द मला घेरून टाकतात...गोंगाट...गलका..कोलाहल...कानात घुमणारा ....

घरी येताना रस्त्यावरच्या गाड्या जणू मला त्रास द्यायला टपल्या आहेत असा राहून राहून वाटतंय ....माझ्या गल्लीत वळल्यावर तिथली निर्मनुष्य शांतता क्षणभर सुखावून जाते...पण क्षणभरच....तेवढ्यातच एक परिचित भेटतातच...तेच जुजबी संभाषण...करायचं म्हणून केलेल...पाट्या टाकल्यासारख....

घरी पोचल्यावर मात्र एक सुखद धक्का ...शांत घर ....कोणीही नाहीये....उबदार घर ...मायेने जवळ घेतं....न बोलताच समजून घेतं....जणू काही त्याला सार काही  कळलय .....

हातातली ओझी तशीच टाकून मी बसून राहते .....काही सेकंद...मिनिट...कदाचित तासभरही .....पुन्हा वर्दळ सुरु व्हायच्या आधी मला ही रिती घागर या शांततेने भरायची असते ....पुन्हा एक नवा दिवस , नवा आठवडा ...दंड थोपटत समोर उभा असतो ....नवी आव्हाने घेऊन ......


( शाळेत एक प्रश्न असायचा - विरुद्धार्थी शब्द लिहा...तसच काहीस वाटतंय आज... काही महिन्यापूर्वी शांतता सुखावून गेली होती ...पण त्याच्या अगदी उलट अवस्था ! ....चालायचंच ....ह्याला जीवन ऐसे नाव !
ती पोस्ट इथे वाचा ...)