Thursday, December 31, 2015

निसर्ग

कधी वाटते तडक उठावे
वाटेने या चालत जावे....

सोडून ही मळलेली वाट....
ओलांडून हा जुनकट घाट....

पोहोचावे त्या वनात नीरव ...
गच्च झाडीचा जेथे मांडव ...

खळखळणारा जेथे झरा ....
अलवार सोबत करतो वारा...

पाय सोडूनी जळात बसावे....
मनातले गुज त्यास वदावे.....

खळखळ झरा जातो वाहत ...
ठेवत नाही काही मनात ....

किलबिल कुंजन सुरेख सुंदर
नाजूक ते रव मनही नीडर....

भिनते अंगी ही शांतता ...
शहरी गजबज निघून जाता ...

प्रतिमा तेथे आपुली पाहून ....
परत फिरावे ताजे होऊन ....

Wednesday, December 30, 2015

मीरा...

" चाला वाही देश " मीराबाईच्या भजनांचा अतिशय सुंदर अल्बम , पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि लताबाईचा स्वर ! एकाहून एक सरस भजनं आणि गायला त्याहून कठीण....ही गाणी गाता येण्याइतपत तयार व्हावं ही माझी सुप्त इच्छा ! असो ....हे घडेल तेव्हा घडेल...तोपर्यंत माझ्या यातील अत्यंत आवडत्या भजनांबद्दल थोडेसे.....
खरं तर मीराबाई ही राजस्थानमधील ... पण पुढे उत्तर प्रदेशात येऊन राहिली असा उल्लेख आहे. तिच्या या भजनांवर मारवाडीबरोबरच ब्रिजभाषेचा प्रभाव आढळतो .या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही पण तरीही मला असे वाटते की ,कदाचित ही भजनं मुळ मीराबाईची नसावीत ....काही ओळी ,शब्द ( किंवा कधी पूर्ण भजनच ) नंतर घातलेले असावेत.

" सखी री लाज बैरन भाई ....."

मीरा कृष्णाबरोबर गोकुळी गेली नाही...जाऊ शकली नाही ...जेव्हा तो रथात बसू लागला तेव्हा,शरमेमुळे मागेच राहिली...आता मात्र विरहाने कासावीस झाली आहे...हृदयावर मोठा पत्थर ठेवल्यागत तिची अवस्था झाली आहे... ती म्हणते...इतका विरह सहन करण्याच्या आधी ,माझे अस्तित्व पंचप्राणात विलीन का झाले नाही....त्या योगे तरी कृष्णाशी एकरूप होता आले असते....

चाल केवळ  अद्वितीय....सखी री , गई आणि गोकुळ वरच्या जागा सुरेख...एक विशेष म्हणजे गाण्याच्या  शेवटी येणारा तो खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज...अलगद पुढच्या गाण्यात मिसळून जातो....


"को बिरहिनी को दुख जाणे है....."

विरहिणीचे दुःख तीच जाणे...कान्हा सोडून गोकुळी निघून गेला...आता तिने काय करावे ?...मीरा विवाहित असली तरीही तिने मनोमन कृष्णाला पती मानले आहे...या विरहाग्निचे औषध तिला ठाऊक आहे....ते औषध म्हणजेच कृष्ण तिच्या तनामनात वसलेला आहे...पण या क्षणी मात्र तिला तो आपल्याहून दूर झाल्याचा भास होतोय ....विरहाग्नीने पोळून उठलेल्या मीरेचे दुःख ही दगड-माती-कचऱ्याचे जग काय समजणार ? हरिशिवाय हे जग,हे सुख व्यर्थ आहे !

या गाण्यातील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ...कोरसचा सुरेख उपयोग...गाण्याला बांधून ठेवायला...गाण्याची सुरुवात तसेच दोन कडव्यांच्या मध्ये ..... तसेच गाण्याचा ताल ( धम्मार ).....





अतिशय सुरेख...तितकीच कठीण गाणी...मनाला ताजेपणा देणारी...मीराबाईच सामर्थ्य की  पंडितजींच्या संगीताच ? माहित नाही....पण आपलं काम श्रवणानंद घेण्याचं...आपण तेच करायचं .............




Tuesday, December 29, 2015

शब्द जुळारी !!

मी तर केवळ शब्द जुळारी ...



भावनांचा पीळ...
लांबलचक वाक्ये...
काही चमकदार शब्द...
काही उद्गारचिन्हे !!!

तोडून फोडून
उलटून सुलटून...
ठेवते समोरासमोर
जरा आलटून पालटून...

कधी जाते जमून
पटकन एखादे यमक
पण असते कुठे त्यात
ती काव्याची महक

नुसतीच बोलीभाषा
असते गद्यच खरे
चांगले म्हटले म्हणून
ठरेल कसे बरे

धन्य ते कवी-शायर
लिहिती सुरेख ओळी
किंवा भावपूर्ण,आशयगर्भ
सुबकशी चारोळी

मी बापडी,उचलून पेन
खरडत राही काहीबाही
मी कसली कवयित्री
मी तर केवळ  शब्द जुळारी !!!

मूर्ती

छे ! नाही !! अजिबात नाही !!!
तू तर "तो " बिलकुल नाहीस....
ज्याला मी शोधतेय
कित्येक वर्षापासून...
तू तर असाच एक आपला
आकाशातला दूरगामी तारा ..

पहिल्यांदा भेटले तुला ...
चक्क देवच समजले !
असाही माणूस असतो का ?
अशा विचारात हरपले...
हळूहळू ओळख...मग मैत्री...
देवाचा माणूस...आणि माणसाचा मित्र....

मग काळाच्या ओघात वाहून गेलो...
कुठे तू...आणि कुठे मी.....
गुपचूप तुझी खबर ठेवून होते
तू मोठ्ठा माणूस झाल्याचे ऐकून होते...
मधल्या काळात माझ्या लेखी...
अधिकच "गुणी" बनलास तू...

मग कधीतरी पुन्हा प्रकटलास ...
या दिव्यजालातून अचानक...
मी आनंदून हात पुढे केला...
अनोळखी नजरेने मात्र तू प्रतिसाद दिला...
आठवण द्यावी तुला...नाही धजावले मी...
"कोण आपण ?" या प्रश्नाला ...प्रचंड घाबरले मी....

असू दे...असतात अशीही माणसे
विसरभोळी....
पण हो...ती तर माणसच असतात.....
आणि तुला तर मी देव बनवलेलं !'
पण तुझे पाय मातीचे होते....
तुझा नाही रे बाबा...माझंच चुकलं !!

वाट

नव्या वाटेवर ,नवे काटे...
नवे दगड , नवे गोटे...

ठेच तर लागणारच...
वेदना जाणारच मस्तकात..
अंगात झिणझिण्या आणि
बधीरता येणारच देहात...

पण तरीही...
पुन्हा उठायच...
विचार न करता...
चालू पडायचं.....

अनुभवायची
वेदनेची धुंदी...
नशीली ....
नविनता पदोपदी....

ही वाट
सतत नव शिकवते....
विजयाकडे
हीच तर घेऊन जाते...

अंतिम जयापेक्षा थरारक
या वाटेचा प्रवास...
एकदम मोठे होण्यापेक्षा
हळूहळू बदलण्याचा प्रयास..



तिन्हीसांज....उडासलेली....

शेखर ताम्हाणे लिखित " तिन्हीसांज  "नाटक ही एक रहस्यमय संगीतिका आहे ( असा त्यांचा दावा आहे )...यात २-३ गाणी जरूर आहेत...जी त्यावेळी ऐकायला छान वाटतात , पण नंतर एकही लक्षात राहत नाही.. .... यातील रहस्य मात्र अगदीच सपक !

मोहन ( अंगद म्हसकर ) एक गाणं हरवलेला गायक,त्याची सुविद्य,श्रीमंत , वकील पत्नी भारती ( शीतल क्षीरसागर ) आणि मुलगा आशुतोष यांच्या सोबत पत्नीच्या प्रचंड मोठ्या वाड्यात राहतोय .मोहनच गाणं त्याच्या प्रेमभंगामुळे हरपलंय ...गेली १४ वर्ष तो एक दारुमय,रिकाम आयुष्य जगतोय.मात्र, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, देवळात आरती सुरु झाली की  त्याच्या अंगात न्यायाधीश संचारतो... आपल्या हरवलेल्या प्रेमाची दाद मागत , जो समोर येईल त्याच्यावर खटला भरत सुटतो.....

आणि अचानक एके दिवशी, त्याची हरवलेली प्रेयसी , शकीला त्याच्या समोर येऊन उभी राहते ...मोहनला त्याच प्रेम आणि गाणं दोन्ही गवसतं..पण त्यातच एके दिवशी अचानक, संकष्टीच्या दिवशी, न्यायाधीश महाराजांचं आगमन होतं....आणि मोहन भानावर येतो, तोपर्यंत शकीलावर प्राणघातक हल्ला झालेला असतो....
इथे पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात रहस्याचा उलगडा....

आधी या नाटकातील जमेच्या बाजू....मुख्य कलाकारांचा  सशक्त अभिनय , नाटकाला थोडंफार सुसह्य बनवतो .विशेष उल्लेख छोट्या आशुतोषच्या भूमिकेतील श्रीराज ताम्हणकर याचा..तबलाही सुरेख आणि अभिनयही सहज सुंदर,नैसर्गिक. शीतल क्षीरसागर- कर्तबगार ,करारी वकील आणि एकतर्फी प्रेमात होरपळणारी पत्नी म्हणून आवडून जाते. कोर्टातील भावनोद्रेकाचा प्रसंगही  चांगला वठला आहे  . अंगद म्हसकरचे लोभस,देखणे व्यक्तिमत्व मोहनच्या भूमिकेला साजेसे . प्रेम, विनोद तसेच भावोत्कटता- सर्वच प्रसंगात उत्तम अभिनय ...विशेषतः न्यायाधीश संचारल्यावर होणारे परिवर्तन ,त्या प्रसंगातला stage चा वापर प्रभावी .

नेपथ्य आणि प्रकाशयोजना चांगली  - घराचा दिवाणखाना ,व्हरांडा ,बाग  आणि बागेतील कारंज सुंदर . शकीलाची वेशभूषा योग्य , १९३६ साली बायका - अगदी शिकलेल्या असल्या तरीही - स्लीवलेस ब्लाऊझ घालत ,की  लांब आणि फुग्यांच्या  हाताचे ....विचार करण्याजोगा प्रश्न ....

कमी पडते ती गोष्ट...नाटकाची संहिता फार दुबळी,तोकडी. दिग्दर्शनही फार प्रभाव टाकू शकत नाही. इतिहासातील आणि वेशभूषेतील चुकांकडे दुर्लक्ष करूनही नाटक फारसे रंगत नाही.कमकुवत प्लॉट ,पटकन समजून येणारे  रहस्य , कोर्टरूम ड्रामा अशी जाहिरात असूनही  कोर्टातील फक्त दोनच...तेही अर्धेमुर्धे  प्रसंग...
नाटकात संगीत आणि रहस्य दोन्ही पुरेसे स्थान मिळवू शकले नाही...कशाला महत्व द्यावे हे न जाणवल्यामुळे दोन्हींवर अन्याय झालाय....रहस्य पुरेश्या विस्ताराभावी सपक,विरळ वाटतं. पहिला अंक अक्षरशः फुकट गेल्यासारखा वाटतो---प्लॉटचा ,ज्याला buildup म्हणतात तो झालाच नाही...प्रेमालाप आणि गाणी यावर फार वेळ फुकट गेलाय. प्रेमकहाणी दीर्घ आणि रहस्यकथा फार त्रोटक असं काहीसा वाटतं. रहस्यमय , कोर्टरूम ड्रामा म्हणून पाहायला येणारा प्रेक्षक नक्कीच निराश होतो.रहस्याचा उलगडा होताना आणि एकदा मोहनच्या तोंडी असलेले " तेंडूलकरी ,उघडे वाघडे "संवाद खटकतात .

एकंदरीत मोठ्या अपेक्षेने रहस्यमय नाटक पाहायला गेलेला प्रेक्षक निराश होणार एवढं नक्की ...




Monday, December 28, 2015

आमचाही एक असाच… बाजीराव

प्रत्येकीच्या मनात
एक बाजीराव असतो…
कधी रोमीयो ,कधी फरहाद
तर कधी फवादही भासतो….

गालावरच्या बटा हटवत
थेट मनात पाहतो…
“खुप सुंदर दिसतेस “
अलगद सांगून जातो…


लाडीगोडी ,छेडखानी
चोरटे स्पर्श उगीचच…
नुसत्या नजरेने त्याच्या
देही उठती रोमांच…


चांदण्या रात्री लाँग वॉक…
कधी मोगऱ्याचा  गजरा…
कधी एकच गुलाब
लालचुटुक टपोरा…


या स्वप्नांच्या गावी…
प्रेमानेच पोट भरतं…
जेवणबीवण ,कामबीम
असं काहीच नसतं…


आमच्या मनातला बाजी
कधीच व्यभिचार नसतो…
खरं सांगू का..हा चेहरा..
आपल्याच माणसाचा असतो….

दोन नाटके...

हल्लीच लागून सुट्टी मिळाली ...म्हटलं सुट्टीचा सदुपयोग करुया...दोन दिवसांत दोन मराठी नाटकं पाहून आले!

खरं तर दोन्ही नाटकं आपआपल्या जागी बरी म्हणता येतील...पण तरीही फार परिणामकारक वाटली नाहीत….

“शेवग्याच्या शेंगा “ या नाटकाची रचना किंवा मांडणी चांगली वाटली. ३ एकट्या व्यक्ती ...आपआपल्या परीने गुंतून राहण्याचा प्रयत्न करतात…..जगण्यतला आनंद शोधू पाहतात…..हे सर्व पाहणारी एक तरूणी...जी गोष्टीतही आहे आणि बाहेरही….तिचा एक वेगळा track...ती एकटी नाहीये…..पण स्वतःचं अवकाश शोधू पाहतेय….एकट्या व्यक्ती सोबत शोधतात….ती मात्र एकटं राहायचं ठरवते…..

खरं तर या नाटकाचं मध्यवर्ती पात्र एकटेपणाच आहे….एकटेपणाची गोष्ट ! तरुण वयात एकटेपणा , ज्याला स्वतःची  स्पेस म्हणता येईल - ती हवीहवीशी वाटते . ह्या स्पेसमध्ये सृजनशीलतेचा जन्म होतो,किंबहुना एकांत हा एक कोरा कॅनवास म्हणा न ...जो आपल्या आवडीच्या रंगानी सजवू शकतो...किंवा कदाचित आपल्या स्पेसमध्ये  कोणीही केलेली लुडबुड गुदमरवून टाकणारीही वाटत असेल . तरुणपणातली स्पेस म्हणजे अनेक शक्यतानी भरलेली पोकळीच म्हणा ना !

याउलट म्हातारपणी मात्र solitude हा loneliness होतो….एकाकी एकांत….अनेक प्रकारच्या भीती मनाला ग्रासतात ….मृत्यू,आजारपण,परावलम्बित्व...सध्याच्या युगात जिथे छोटी कुटुंबे आहेत, तिथे ही स्थिती प्रत्येक जण थोड्याबहुत फरकाने अनुभवतोच.ह्या सर्व शंका तरुणपणी मनाला शिवतही नाहीत...खूप वेळ आहे अजून या गोष्टींना…. असच वाटत राहत !

ह्या नाटकाचा शेवट सकारात्मक आहे...आशादायक आहे...प्रत्येकाने आपली वाट , आनंद शोधायचा असतो...आणि प्रयत्नाती तो नक्कीच मिळेल !

दुसरा नाटक  “ठष्ट “- अत्यंत वेगळ नाव - हा खरं तर “ ठरलेला लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट “ ह्या phrase च पहिल आणि शेवटच अक्षर घेऊन बनलेल नाव आहे.हे नाटक खरं तर आवडलं की  नाही सांगता येणं कठीण...कदाचित नाटककारालाही आपलं नाटक लोकांना  आवडाव अशी  अपेक्षा नसेल...घणाचे घाव आणि मेंदूला   झिणझिण्या हेच याच वर्णन !एका खोलीत राहणाऱ्या चार मुलींची ही गोष्ट. नाट्य किंवा घटना त्यातल्या दोघींबरोबर घडते,इतर दोघी साक्षीदार किंवा भाष्यकार म्हणू हव तर .

स्त्रीमुक्तिवादी पण नकारात्मक ….माझ्या मते तरी  ….स्त्रियांवर इतके अन्याय होताना पाहून जीव गुदमरतो...सत्य परिस्थिती आहे, मान्य आहे - पण शेवट सकारात्मक करता आला असता. स्त्रीमुक्ती म्हणजे आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाचा सतत उच्चार करत राहणे नव्हे,तर त्यातून मार्ग काढत बाहेर पडणे,ताठ मानेने उभे राहणे…..आपले आणि अन्यायकर्त्याचे आयुष्य संपवणे नव्हे !

तर अशी ही  “ मी पाहिलेल्या दोन नाटकांची कहाणी “…. (  “ मीणी “...अस म्हणू शकते का ? )

Wednesday, December 16, 2015

वाटेवरील सोबती - विजय पाडळकर

" सिनेमाचे दिवस " हे मी विजय पाडळकर यांचं वाचलेले पहिलं पुस्तक ! पुस्तक , त्याची संकल्पना आणि एकंदरीतच त्यांचा लिखाण मला फार आवडलं होत....विशेषतः " फिल्म appreciation course " करण्याची कल्पना ...
हे पुस्तक याआधी वर्तमानपत्रात मालिकेच्या रुपात प्रसिद्ध झाल आहे. विविध पुस्तकांतील आवडलेल्या व्यक्तिरेखा ...जणू आपल्याला भेटलेली अनेक रंगा-ढंगांची माणसे ! ( माझ्याही मनात ही कल्पना घोळतेय....पण  समित बासूचा किरीन , साॅमरसेट मॉमचा लॅरी डॅरेल, झोरबा द ग्रीक ,फार फार तर जेन मार्पल आणि मॉमचीच जबरदस्त जेन ह्या पलीकडे काही सुचले नाही...)

या पुस्तकात उल्लेख केलेली अनेक पुस्तके मी वाचलेली नाहीत - काहींबद्दल ऐकून किंवा वाचून थोडंफार माहित आहे, जसं बिभूतीभूषण यांचा  अपु . काही अगदीच अपरिचित आहेत , काही इतकी दुर्मिळ असावीत की वाचायला मिळतील की नाही हीच शंका येते ! काही व्यक्तिरेखा उदा. कवी रेनर मारिया रिल्के आणि चित्रकार वॅन गाॅ - हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांद्वारे लेखकाला भेटले - एक वेगळा आणि वैशिष्ठ्यपूर्ण  आविष्कार ! तर अॅलीस ( इन वंडरलॅन्ड ) आणि हेमिंग्वेचा म्हातारा ( द ओल्ड मॅन अॅंड द सी ) अजरामर व्यक्तिरेखा ! Jean Christophe ही महाकादंबरी आणि तिचे लेखक  Romain Rolland ह्यांची माझी भेट होणा अशक्य ( कादंबरी १० खंडात लिहीली गेलीये ! ...पण यातील एक कल्पना फार आवडली - आत्म्याला आत्म्याचा स्पर्श होण्याचा अविस्मरणीय क्षण ! यातील Antonetti  ही छोटीशी व्यक्तिरेखा , जिच्याबद्दल लेखकाने सुरेख लिहिले आहे . )

अतिशय आवडल्या आणि म्हणून नक्की वाचेन अशा काही व्यक्तिरेखा !

माचीवरला बुधा - गोनीदांची मी  अनेक पुस्तकं वाचलीत पण हे राहून गेलं (  जैत रे जैत , कुणा एकाची भ्रमणगाथा ,आम्ही भगीरथाचे पुत्र आणि रुमाली रहस्य ही विशेष आवडती - विशेषतः रु.र. - ही केवळ एक उत्तम रहस्यकथा म्हणून नाही तर त्यातल्या भन्नाट वातावरण निर्मितीसाठीही ! सतत कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात बसून आपण वाचतोय, असे भास व्हायचे मला !) ह्या लेखातून भेटलेला बुधा थेट थोरोशीच नातं सांगतो - थोरो दोन वर्षांसाठी वाल्डेनकाठी राहिला तर बुधा निवृत्तीनंतर गावाकडे, निसर्गाच्या सानिध्यात - आपण इथेच मरायचं अस ठरवून आला . दोघेही पोटापुरत पिकवून खातात , निसर्गाशी मैत्री करून ,त्याच्याशी एकरूप होऊन राहतात ...वाचून आपणही खूप शांत, समाधानी होतो !

दुसरं पुस्तक इंग्रजी - Goodbye Mr. Chips - मि. चिप्सची व्यक्तिरेखाही समाधानी आयुष्याच एक सुरेख उदाहरण -- आपलं कार्य आपल्याला पैसा ,प्रसिद्धी देतं की नाही यापेक्षा काम उत्तम रित्या पार पडल्याचं समाधान देतं की  नाही , हे जास्त महत्वाच ! आवडीच काम आणि आपण कुणाच्यातरी आयुष्याला चांगली दिशा देतोय ही भावना , ही पुंजी आयुष्यभर पुरू शकते...अगदी एकटेपणातही !

Flowers for Mrs. Harris मधील नायिका हॅरीसबाईही तशाच ! म्हाताऱ्या , गरीब,घरकाम करणाऱ्या , पण छोट्या गोष्टींत आनंद मानणाऱ्या, समाधानी.

ह्या तिन्ही व्यक्तिरेखांत एक समान धागा आहे - समाधानाचा....

पण  "भेट "ह्या जी ए कुलकर्णींच्या कथेत भेटणारा अश्वत्थामा मात्र पूर्ण वेगळा ! ही कथा शाळेत अभ्यासायला होती . गूढ , थोडी भीतीदायक अशी ही गोष्ट - कुठल्याशा जंगलात , कपाळावर भळभळती जखम घेऊन अश्वत्थामा अजूनही फिरतोय अशी कल्पना....त्याची भेट गौतम बुद्धाशी होते....गौतम मरणाला शाप मानत असतो तर जखमी , हतबल, मरणाची वाट पाहणारा ,रिकामं -अश्रद्ध - वैराण आयुष्य जगणारा अश्वत्थामा सांगतो - अमरत्व हा शाप आहे ! त्याच्या हातून घडलेल्या महापापाला हजारो वर्षे लोटली , पण त्याला उःशाप मात्र नाही ! देव तर सर्वांना माफ करतो, मग ह्यालाच का असं आयुष्य ? ( असा मला शाळेपासून पडलेला प्रश्न !)

ह्या काही विशेष आवडलेल्या व्यक्तिरेखा ....किंवा जवळच्या वाटलेल्या ...हा विषय आपणही कधी तरी हाताळावा अस पुन्हा एकदा सुचवून गेल्या !




Sunday, December 6, 2015

गाण्याची परीक्षा ...न दिलेली !!

या शनिवारी ,खरं तर मला गाण्याची परीक्षा द्यायची होती...म्हणजे माझा form भरून झाला होता...hall ticket सुद्धा आल होतं....पण अस्मादिक घाबरले ! इतक्या वर्षांनी परीक्षा ! बाप रे !! मग माझ्या अंतर्मनाने ( बहुदा !) पाठदुखी निर्माण केली...त्यामुळे मी परीक्षेला जाऊच शकले नाही ! ( हुश्श !!) मी अक्षरशः एक आठवडा आधी पाठांतर सुरु केल होत...त्यामुळे ....जाऊ दे...अधिक न बोलणेच बरे...

मग विचार केला...ही परीक्षा देणं खरच जरुरी आहे का ...म्हणजे आपण form वगैरे भरला हे ठीक....पण परीक्षेमुळे खरच काय होतं ? लताबाई ,किशोरीताई किंवा वसंतराव यांपैकी कोणी परीक्षा दिली आहे ? तसाही परीक्षा देऊन पास झाले असते ,तर त्याचा अर्थ हे आठ राग मला समजले असा आहे का ? ( खरं तर कुठल्याही परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न उभा राहतो....) बिलकुल नाही....

मला वाटतं की मला गाणं समजतच नाही...फक्त मी सुरात गाते ,माझा आवाज चांगला आहे आणि मी गाण्यांची उत्तम नक्कल करू शकते ..बस्स एवढच ! मला न सूर समजतात न राग... किंबहुना मला असा वाटत की मी गाणं हे कुठच्याही शास्त्राप्रमाणे शिकू पाहतेय ...शास्त्रीय संगीताचे शास्त्र...आरोह,अवरोह,पकड,सरगमगीत , आलापीसहित एखादी बंदिश वगैरे शिकल की गाणं आलं ?
गाण्यात खरं तर Left Brain चा उपयोग मर्यादित ! Right brain वापरून संगीताची अनुभूती व्हायला हवी ....शास्त्रीय संगीत म्हणजे अमूर्त ! फक्त स्वरातून अनेक गोष्टी सांगणारं ! ..माझे तर कानही अजून शास्त्रीय संगीत फारसं स्वीकार करू शकले नाहीत ! ( खरं सांगते ...मी फक्त चित्रपट संगीत आणि सुगम संगीतच ऐकते ) तर ते आत्म्यापर्यंत कस काय पोहोचेल ?

सूर मनाच्या गाभ्यापर्यंत पोचायला हवेत....पण पहिल्या काही मिनिटांत माझी बुद्धी जागी होते आणि चुळबुळ करू लागते...शब्दांना प्राधान्य न देणारे सूर नाकारू लागते....भिंती उभ्या करते ....त्यातून ते सूर ( शक्तिशाली असले तरीही बापडेच !) आत जाऊ शकत नाहीत ! Right Brain वापरण्यासाठी आधी मनाच्या खिडक्या उघडता यायला हव्यात !!

कदाचित कट्यार किंवा नाट्यसंगीतासारख एखाद संगीत , या मूर्त आणि अमूर्तातील दुवा ठरत ! मी कट्यारची,माझ्या मनावर विलक्षण प्रभाव टाकून गेलेली गाणी , या सकारात्मक बदलाची नांदी आहे अस मानतेय ! माझ्या गाणं समजण्याच्या प्रवासाची सुरुवात !!


पण जर अस झाल नाही , तर मात्र मला खेदपूर्वक, उत्तम नकलाकार म्हणूनच मार्गक्रमण करत राहाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही !!

दिसामाजी काही लिहीत जावे ....

गेले काही दिवस काही चांगल लिहून होत नाहीये...किंवा जमत नाहीये म्हणा ....विषय सुचत नाहीत तर कधी काही चांगले विषय सुचले, तरी त्यावर लिहिणे जमत नाही....पेन पुढे सरकत नाही....

मुद्दाम लिहायला बसलं की लेखणीही बंड करते कधी...शब्द उमटतच नाहीत...अनेक विषय बाद करते...छे ! यावर काय लिहायच ?.... हा नकोच ...अनेक शंका !

काही दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यातून न मिळणाऱ्या वेळेमुळे असेल किंवा मनाला मोकळेपणे विचार न करू देणाऱ्या चिंतेमुळे असेल .... त्याहीपेक्षा म्हणजे स्वतःच्या लिखाणाचा जो मनात बागुलबुवा निर्माण झालाय त्यामुळे असेल , लिहिणे जमत नाहीये एवढे मात्र खरे....

असो...सर्व दिवस सारखे नसतात ...निसर्गही इतका वैविध्य दाखवतोच की .....कधी कोवळ ऊन आणि अगदी हव तस,सुखद,आल्हाददायक वातावरण...कधी भयानक तल्खली ....कधी ढगाळ, कुंद हवा... कधी बोचरी थंडी....माणूस तर निसर्गाचा नाठाळ ,हटवादी पुत्र ! निसर्गाहूनही मनमानी !

कधी मन बंड करत...काही लिहायचच नाहीये मला....बकवास लिखाण ! कोण वाचणार ते ! किंबहुना यापुढे कधी लिहायचच नाही....

तर कधी नवाच प्रकार ! ....पहिली दोन वाक्य ...अगदी लख्ख...चमकदार ...आणि पुढे ? वैराण वाळवंटच जणू !

कधी  कधी थोड नाटक करतं.... आपल्याला “ लेखकराव “ बनवायला पाहत....फक्त दाखवण्यासाठी लिखाण...मनापासुन नाही, तर प्रदर्शनासाठी.....चकचकीत पण बेगडी, मुलामा दिलेल.....असत मधेच एखाद  सोन्यासारखा तळपत वाक्य....पण नाहीच शक्यतो....कारण हात आणि लेखणी अगदी एक होतात, तेव्हाच काहीतरी उमटतं कागदावर...सुरेख आणि सुरेल....नाहीतर ? नुसत्याच रेघोट्या....

पण या रेघोटयांचाही उपयोग होतो कधीतरी....रेघोट्या एकत्र करून एक झाडू बनवावा आणि मनाचा तुंबलेला नाला साफ करावा.....( शी ! वाईट उपमा ! )....किंवा ह्या रेघोट्या म्हणजे जणू दगडगोटयाचा एक बांधच....जसा कागदावर मनातून उमटतो तसा मनातून नाहीसा होत जातो....विचार पुन्हा प्रवाही होतात....

असं हे लिखाण...सतत लिहू ‍पाहणाऱ्याची ( लेखक म्हणणार नाही) परीक्षा घेतं....सतत प्रश्न विचारत....

आहे तुझ्याकडे चिकाटी ? .... सतत न हरता , न थकता , पुढे जाण्याची ?

आहे वेळ ? आजच्या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट ?

आहे प्रचंड आशा ? जी सतत या कामात येणाऱ्या निराशेला ,frustration ला हरवेल ?

आहे धैर्य ? लोकांसमोर येण्याचं....सत्य सांगण्याचं...आपण कोण आहोत हे मांडण्याचं...आणि सतत आपल्याला कोणीतरी judge करणार हे स्वीकारण्याच ? ( प्रत्येक लेखन हे लेखकाचा थोडा अंश घेऊनच जन्माला येतं....मात्र त्यातून डोकावणारा लेखक  वाचकांना दिसेलच अस नाही...)

तर जसं समर्थ म्हणाले (...त्यात थोडा फेरफार करून...)...दिसामाजी काही लिहीत जावे ....त्यामुळेच, सर्व प्रश्नांना सामोरे जाऊन , हात लिहित ठेवणे हाच उपाय ! त्यातूनच लेखक पुढे सरकतो !

म्हणून,लिहित राहा !!



Sunday, November 29, 2015

कट्यार काळजात घुसली !!! ( आणि पार आरपार गेली !)



MPM२ वर लिहिताना म्हटल होता तसच आताही म्हणतेय....हे परीक्षण नाहीये....कारण ह्या चित्रपटाच परीक्षण करणे म्हणजे दारव्हेकर , वसंतराव आणि अभिषेकींच परीक्षण केल्यासारख वाटेल !
हा चित्रपट मी एकटीने जाऊन पाहिला – एकट्याने चित्रपट पाहण्यातही एक वेगळी मजा असते... तुम्ही अगदी मोकळेपणे येणाऱ्या अश्रुना वाट देता...कोण काय म्हणेल याचा विचार न करता .....

सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट ....आणि जुन्या संगीत नाटकांच पुनरुज्जीवन करण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य ! नवीन पिढीला “ बद्तमीज दिल आणि मटरगशती “ च्या खेरीज इतरही संगीत अस्तित्वात आहे ह्याची जाणीव झाली . मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आलेत ही समजूत अधिकच पक्की झाली .

हा चित्रपट खरं तर मी गेल्या आठवड्यातच पाहिला ....पण मी त्या अनुभवाला मनात रुजू देत होते जणू.....पाहताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू वाहू लागले....खरं तर प्रसंगांमुळे नाहीत तर संगीतामुळे....अंगावर रोमांचही उभे राहत होते अनेक वेळा ...सुरांची ताकदच आहे तेव्हढी ....
पहिल्या प्रेमाचा तो भर उतरल्यावर मी किंचित critical दृष्टीने आज पुन्हा त्या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रयत्न केला ....तेव्हा मला जाणवले की संगीतच खरं आहे ह्यात...इतर काही फारस महत्वाच नाही...
मुळात हे नाटक लिहिले गेले तेच संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी , त्यामुळे ही कथा साधीशी असणार यात नवल नाही , ह्या नव्या रुपात चित्रपट चकचकीत आणि दिमाखदार दिसतो यात शंकाच नाही पण तरीही संगीत हेच मध्यवर्ती !

दोन संगीत घराण्यातल्या स्पर्धेची ही कथा – पंडित भानुशंकर आणि खांसाहेब यांची –कट्यार जिंकण्याच्या स्पर्धेची ...सतत १४ वर्ष खांसाहेब ही स्पर्धा हरतात . आणि १४ वर्ष त्यांच्यावर ( काहीसा) अन्याय होत राहतो ...आपल्या कानांना दोघांचही संगीत अगदी सारखंच प्रभावशाली वाटतं आणि राजेसाहेब कायम भानुशंकर यांना झुकतं माप देत आहेत अस वाटत राहत .१४ वर्ष उत्तम गाऊनही , स्पर्धेचे विजयीपद तर राहोच पण दोन वेळच्या खायचीही भ्रांत ! सतत अन्याय झाल्यावर कोणीही माणूस सुडाने पेटून उठतोच ( आपले हिंदी चित्रपट याचे सतत दाखले देतात !) पुढचा चित्रपट या सूडाचा प्रवास आणि शेवट दाखवतो....

खटकण्यासारखे अगदी थोडेसे – वेशभूषा काही ठिकाणी ( उमेची अमराठी साडी आणि भानुशंकर यांची मद्रासी पगडी ) तसाच झरिना मशिदीत जाऊन कशी काय कव्वाली ऐकते हा प्रश्न ...बर ऐकते तर ऐकते पण परदा न करता , परपुरुषासमोरही जाते हे थोडे खटकले.( भानुशंकर आणि विशेषतः उमा बिनदिक्कत मशिदीत जातात हेही नवीनच !)

शंकर महादेवन मुळात अभिनेता नाही त्यामुळे त्यांना कस लागेल असे प्रसंग देण्यात आले नाहीत . पण त्या व्यक्तिरेखेसाठी योग्यच ! सज्जन , ज्ञानीं आणि पट्टीचे गायक ते निश्चितच वाटतात. सचिनजीचा underplay केलेला खांसाहेब आणि त्यांच उर्दू झक्कास ! सुबोध भावे सदाशिव म्हणून चपखल ! ( गाताना मात्र दोघांचाही अभिनय किंचित  कृत्रिम  वाटतो )

Climax फार परिणामकारक विशेषतः तराणा ...अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात पाणी! दुसरा आवडलेला scene काजव्यांचा ...कल्पक आणि उत्तम आकारलेला....देस रागातल “ मन मंदिरा “ अप्रतिम !...शिवम आणि शंकर महादेवन या पितापुत्रांनी गायलेल....संगीताची ताकद जाणवते ....गायकांचा बुलंद स्वर निळ्या आकाशाच्या घुमटावरून परावर्तीत होतो...आपल्या शरीरावर फुटलेल्या असंख्य कानांमधून आत शिरून  थेट आपल्या आत्म्याला भिडतो असा सतत जाणवत रहात.....

एकंदरीत गाणं ह्या चित्रपटाचा आत्मा आहे , गाण्याशिवाय हा चित्रपट शून्य आणि गाण्यामुळे हा चित्रपट लक्षणीय बनलाय . त्यामुळे आभार ....राहुल देशपांडे, महेश काळे आणि शंकर व शिवम महादेवन यांचे ! एक भव्य संगीतमय अनुभव !!  

Sunday, November 22, 2015

गोष्ट त्याची आणि तिची ....

मी आधीच स्पष्ट करते - हे परीक्षण नाहीये...फक्त काही विचार आहेत...चित्रपट पाहताना आलेले !

आज सतीश राजवाडेचा मुंबई-पुणे -मुंबई २ पाहण्याचा योग आला . ( हो , मी त्याला  ‘ राजवाडेचाअसाच म्हणणार , कारण मी राजवाडेची खूप मोठी  fan  (का काय म्हणतात ना  ती - )आहे  . असंभव मध्ये विक्रांत म्हणून तो फार आवडून गेलेला ….पानाच्या पान खरडलेली त्याच्यावर...जाऊ दे..ते पुन्हा कधीतरी ! )

तर MPM १ आवडला  होता...म्हणून हा बघायचा होता एवढा नक्की . MPM १ मुख्यतः दोन पात्रांची कथा - ज्यांची नावही आपल्याला समजत नाहीत - दोन्ही कलाकारांनी ती छान पेलली होती . अतिशय छान , चुरचुरीत म्हणता येतील असे संवाद - कथा नव्हती तरी त्या चित्रपटाला उद्देश निश्चितच होता .

आजचा भाग मात्र मला काहीसा निरुद्देश वाटला . पहिल्या भेटीत तिने लग्नाला होकार दिला हे ठीक - ( आता त्या दोघांचा गौतम वं गौरी म्हणून बारसं झालय बर का ! ) खरं तर तिने स्पष्ट होकार दिला नव्हता असा मला अंधुकस आठवतंय -(  तरी बर - दोघांनी एक पूर्ण दिवस एकामेकांच्या  संगतीत घालवला होता - नुसता CCD मध्ये दोन तास भेटले नव्हते - आमच्या वेळी अस नव्हत हो ! ) तरीही तिला ही घाई आहे अस वाटत राहत -( बर - वाटेना का ?) कर्मधर्मसंयोगाने त्याला दोन तीन वेळा भेटींची वेळ सांभाळता येत नाही , त्यावरून ही बया लग्न मोडायच ठरवते -मग उर्वरित चित्रपट - पुनश्च प्रियाराधन !  अगदी लग्नाचा दिवस येऊन ठेपतो तरीही हिचा निर्णय काही होत नाही - वाटत - हिला सांगाव - " बाई,  एक काय ते बोल - इस पार या उस पार ! "

आणि अधून मधून आपल्याला Tissot च घड्याळ , रेड label चहा आणि प्रभातच तूप  आणि इतर dairy उत्पादनं याबद्दल माहिती मिळत राहते – प्रेक्षक पाहतात म्हणून काहीही माथी मारा !

एवढा मात्र नक्की – कंटाळा येत नाही – चित्रपट भराभर पुढे सरकत राहतो . खरं तर हा गौतमचाच  चित्रपट , गौरीने फक्त गोंधळाचे अनेक रंग दाखवलेत – अंगद म्हसकर ( अर्णव ) खरं सांगायच तर फार प्रौढ वाटतो- खरं तर कोणीही अगदी तारुण्याच्या पहिल्या भरात नाहीये – तशी अपेक्षाही नसावी या पात्रांकडून .

स्वप्नीलने ( त्याचे काही irritating हसण्याचे shots वगळता ) चांगला अभिनय केलाय . कुटुंबातल्या इतर सदस्यांनी त्यांचे इवलुइवलुसे roles चांगले निभावलेत . पहिल्या भागातले बरेचसे धागेदोरे जुळवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय – जे नाही जुळले ते थापा होत्या म्हणून सोडून दिलय .पण तेही पचत आपल्याला !

माझ्यापुरत सांगायचा झाला तर मला हा चित्रपट आवडला – मी त्याला माझ्या ब श्रेणीत टाकलाय ( म्हणजे बघताना छान वाटले पण परत पहावासा वाटत नाही , पहिला भाग मात्र अ श्रेणीत !  ) आणि एक दुसरा खास निकष – चित्रपट पाहताना रडू आलं तर तो मनाला भिडला ! ( साधारणपणे अर्धा लिटर अश्रू ढाळले मी ! )


शेवटी तो सतीश राजवाडेचा चित्रपट आहे ( आणि तोही पार्लेकर ! ) त्यामुळे त्याला पास होण्यासाठी कमी मार्कांची गरज असणार ! 

Sunday, November 15, 2015

रंग शांततेचा , निळाईचा ......

नवरात्र कधीच संपली...नऊ रंगाची नवरात्र....

अनेक रंग आपल्याही मनात डोकावत राहतात .....आपल्याला घेरतात ......कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ......

त्यातील एक रंग....आजचा रंग.....शांततेचा .....निळा......

रात्र बरीच झालीये....सर्वत्र सामसूम.....फक्त पंख्याचा ताल....आपल्याच मस्तीत , आपल्याच गाण्याचा ठेका धरतोय....ह्या तालावर बसणार एक गाण मी हलकेच गुणगुणते....गाणं संपता तोवर हा पंख्याचा ताल माझ्यात भिनून जातो....आजूबाजूच्या शांततेत वेगळा जाणवेनासा होतो......

मधेच AC खडबडून जागा होतो.....होऊ दे ! ....जागा होतो तसाच परत शांतही होतो....गुपचूप आपलं काम करत राहतो.....खोलीभर सुखद गारवा.......

शांतता मला आकाशी -निळी भासते .....मनात एक चित्र ....विस्तीर्ण पसरलेला माळ....सोनेरी ऊन आणि निरभ्र , निळे आकाश......फक्त वाऱ्याचा आवाज ......आकाशाची निळाई आणि शांतता .....चोहोबाजूंनी वेढून घेणारी !

डोळे मिटावेत.....शांत बसावं....हळू हळू ही शांतता आपल्यात भिनू द्यावी....मग हलकेच ऐकू येऊ लागतं...शांततेचं संगीत .....जणू निळी बासरी....मनाच्या कानाने ऐका .....निळी शांतता सांगतेय.....मी आहे....इथेच ....तुझ्यासोबत , कायम.....

कधी ह्या संगीताची परिणती हर्षाने होते.....कधी डोळ्यातून एखादा अश्रू टपकतो.....निळाच....कधी ह्या अलवार , तलम शांततेच्या लाटेवर स्वार होऊन एखादी कविता येते , कधी ललित स्फुट .....

ह्यालाच ध्यान म्हणतात का ?

कधी ही शांतता मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतच नाही......मनात एक खदखदणार रसायन उकळत असत.....ह्या निळाईला गिळू पाहत......मग ह्या उसळणाऱ्या विचारांतून एखादा धागा पकडते आणि लिहू लागते.....हळू हळू रसायनसुद्धा निळच होऊन जातं......उरते एक तृप्त शांतता.....

आयुष्य आणि कविता .....
अलगद उलगडावं....
एक एक धागा....
नाजूक, रेशीम...
गाठ न पडता....
हळूच सोडवावा....
तलम वस्त्र...निळेशार
जणू मखमली मोरपीस ....
अलवार विणावे....
आणि करावा
नाजूक कशिदा ...
सोनेरी .....




Thursday, November 12, 2015

जुन्यामाजी थोडे नवे !

जुनी गाणी मला खूप आवडतात- पण ती ऐकायला जास्त ! Youtube आल्यापासून आता कोणतेही गाणे बघणे सहज शक्य झालय . काही काही गाणी अगदी जुन्या काळात घेऊन जातात - त्या श्वेत शामल काळात - जेव्हा नायिकेच रूप खुलून दिसायच-कदाचित त्याच कारण आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा makeup जाणवत नसेल म्हणूनही....

असो...

आज जुन्या गाण्यात रमणार नाहीये....आज काही नव्या गाण्यांबद्दल....

काही काही नवी गाणी अगदी अद्भुत वाटतात मला - विशेषतः रेहमान , शंकर-एहसान -लॉय यांची - आणि चित्रीकरण म्हणाल तर संजय लीला भन्साळीची !

हल्लीच त्याच्या बाजीराव मस्तानी मधील ' दीवानी मस्तानी ' पाहण्याचा योग आला -  ( खरं तर इतक्या मुबलक प्रमाणात इंटरनेटवर जे उपलब्ध आहे त्याला काय योग वगैरे म्हणणार ? ) पण छान चित्रीकरण - भव्य  , सुरेख सेट  - भन्साळीच्या इतमामाला  शोभेलसा - लाखमोलाची दिसणारी दीपिका -  मस्तानी म्हणून ती कशी दिसेल हे पूर्ण सिनेमा पाहिल्यावरच कळेल  .....पण या गाण्यात खूप सुंदर ! रणबीर सिंघही बाजीराव म्हणून चांगला दिसतो - ( फक्त एक mature आणि लढवैया राजा म्हणून अगदी किंचित कमी वाटला - कारण त्याच स्मितहास्य - जे अगदी हळू फुलणारंकिंवा अस्फुट हव होतं....हे आपल माझं मत - पेशवे आपल्या खऱ्या  भावना चारचौघात काय तर कधीकधी स्वतःलाही कळून देत नसावेत ! )

गाण्याला एकाच कडव आहे - मध्ये मध्ये filler music चे बरेच तुकडे - जे ही कानाला गोड वाटतात - खूप छान orchestration - खरं तर  चाल  किंवा शब्द उत्कृष्ट नाहीत - पण परिणामकारक नक्कीच आहेत - विशेषतः श्रेया गोशालचा आवाज ! फार सुरेख ! आता मस्तानी या प्रकारचे कपडे घालून , अस तंतुवाद्य घेऊन , अस नृत्य करत असेल हे माझ्या मनाला थोडा खटकल - पण थोडच !

यानंतर लगेच ' नगाडा संग ढोल " आठवतं - कारण तीच team आहे - खरं तर गाण्याची चाल आणि शब्द फारसे आवडले नाहीत - पण पुन्हा श्रेयाचा आवाज - तीक्ष्ण सुरीसारखा धारदार  ! ढोलकीच्या ( ? ) beats ने ते गाणं खूप energetic झालय - मला सर्वात काय आवडत असेल तर ह्या गाण्यात असलेली रंगांची कल्पक योजना ! दीपिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आणि नाचतेही - तिचे आणि सर्व dancers चे well-synchronised costumes  - लक्षवेधी लाल रंग ...दीपिकाचे नैसर्गिक wavy मोकळे केस आणि त्यांचा नृत्यातला कल्पक वापर ह्या गाण्याची ऊर्जा अधिकच वाढवतात .

ह्या रंगांपुढे कधीतरी आपली जुनी गाणी फिकी वाटतात ...पण क्षणभरच ! कारण ही रंगाची उधळण कालानुरूप फिकी पडते पण मुळची फिकी असलेली गाणी मात्र अधिकाधिक गहिरी होत जातात !

जाताजाता -

धूम ३ मधल " मलंग " हे गाणं पहिल्यांदाच नीट ऐकलं - कारण ते शंकर महादेवनच्या मोठ्या मुलाने  - सिद्धार्थने गायल आहे  - शब्द फार छान आहेत !  ' मलंग ' शब्दालाही अर्थ आहे - पहिल्यांदाच कळल ! पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी !


आठवणी- ४

Anatomy चे इतर भाग मला फार आवडायचे - त्यात embryology आणि genetics होते. या विषयांची आमची अभारतीय पुस्तकही फार छान होती.डॉ. अय्यर embryology शिकवत असाव्यात - अस अंधुकस आठवतंय- खूप छान शिकवायच्या आणि होत्याही खूप छान - अगदी हसतमुख . डॉ .क्रिष्णा genetics शिकवायचे-त्यांचे ( south इंडिअन) उच्चार पटकन समजायचे नाहीत.एकदा त्यांच्या पिरियडला मी पहिल्या बेंचवर बसून झोपा काढत होते म्हणून मला ओरडले होते ! ( एकंदरीत झोपेच दुखणं फार जुनं ! )



 पहिल्या वर्षीचा तिसरा विषय म्हणजे Biochemistry ! माझा अत्यंत नावडता विषय !! तेव्हा जर मला कळल असतं की हाच विषय माझा उपजीविकेच साधन होणार आहे तर मी त्याकडे अधिक लक्ष दिल असत  !! ( म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर....बोलण्या सारखच आहे ! )खरं तर इतका रटाळ विषय नाही दुसरा medicine मध्ये ! मला कधी तो समजलाच नाही . फार थोडे शिक्षक आठवतायत- तेही फारसे inspiring नव्हते. परीक्षेतही दांडी गुल होता होता राहिली. माझ त्या paper ला घड्याळ बंद पडलं- शेवटी कसबसं - अगदी खराब अक्षर काढत- तो paper पूर्ण केला. हं- तसा अभ्यासही झाला नव्हता - कारण उद्या शेवटचा paper या विचाराने मला आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की मी मन एकाग्र करूच शकत नव्हते . त्यात गरब्याचे दिवस ! त्यावेळी आमच्या सोसायटीत खूप मोठ्या प्रमाणावर दांडिया व्हायचा - त्यामुळे प्रचंड आवाजही मला ( अभ्यास न करण्यासाठी ) मदत करत होता !

बाकीचे papers , परीक्षा काही केल्या आठवत नाही- practicals ही नाहीत.Term exams च्या आधी धडधडण आठवतंय आणि संपल्यावर - फक्त परीक्षा संपल्याचा आनंद आठवतोय ! सर्व परीक्षा मी पास तर झाले पण कधी चमकले नाही. शाळेत  'आपण हुशार आहोत  ' अस वाटण ,  कधी  'आपण अगदी ढ आहोत '  यात बदललं कळलही नाही - इंग्लिश बोलण्याबद्दलचा न्यूनगंडही होताच .

MBBS मध्ये गेल्यावर पहिल्यांदा train चा प्रवास सुरु झाला. त्या आधी मी ठाण्यातच शिकत होते. आईने मला ट्रेन प्रवासाच्या आधी खूप instrutions दिलेली आठवतात - आपली नेहमीचीच - पिढ्यानपिढ्या आया देत आल्यात तशीच ! ठाणे ते सायन मस्त झोप काढायचे - ( माझ्या गोष्टीत झोप वारंवार येते - जशी मला येते तशीच ! )   पहिल्या दिवसापासून माधुरी आणि मिताली माझ्याबरोबर असायच्या. मग पुढे पुढे आमचा central रेल्वे वाल्यांचा मोठठा ग्रुपच झाला . हळू हळू सर्वांची ओळख झाली आणि आमची batch किती छान , साधी, सरळ आहे हे कळल .

आणखी काही ठळक आठवणी पहिल्या वर्षीच्या -

Social - हे नावच मी इथे येऊन ऐकलं . उत्सुकता होती काय असत त्याची. त्यासाठी रात्री यावं लागणार होतं . हे पहिल social आमच्या senior batch ने आमच्या साठी दिल होतं . सर्वच socials अगदी २-३ वाजेपर्यंत चालायची . त्यानंतर पहाटेच्या पहिल्या ट्रेनची वेळ होईपर्यंत इथे तिथे वेळ काढायचा. ( जेव्हा मी hostel मध्ये राहत नव्हते तेव्हाची गोष्ट ) पहिल्या socialमध्ये मी वर्गात धड कोणालाही ओळखत नव्हते - ते college सुरु झाल्यावर लगेच झाल होतं -  पण तरीही मजा आली होती - एक नवा अनुभव होता - रात्रभर नाचण्याचा - ( पुढे दोन दिवस पाय दुखत होते खूप ) काही games , dinner - पण एकंदरीत ओळख करून घेण्यासाठी - social interaction वाढवण्यासाठी म्हणून ते social ( असावं ) मराठी शाळेतून आलेल्या मला थोडा cultural shock असला तरी या पुढची , फक्त आमच्या वर्गाची socials मी खूप enjoy केली.

LTMMC Day साठी झालेली माझी audition - माझ्या मते मी चांगली गायले होते , पण तरीही माझी निवड  झाली नव्हती. माझी जवळची मैत्रीण मितालीची निवड  झाली -  त्यासाठी थोडा आनंद आणि थोडी असूया वाटलेली आठवते ! ( मी " ओ सजना " म्हटल होतं . )


पहिला college फेस्टिवल ज्यातलं फार काहीच आठवत नाही , फक्त एक दिवस थांबून  " तेजाब " सिनेमा पहिला होता. तसाच पहिल monsoon  melodies - पण त्यात मी बहुदा गायले नव्हते .

 पहिला वहिला College day - ज्यात आम्हाला आमच्या seniors ने जे सांगितलं तेच गाणं म्हणायच अशी सक्ती होती. मी , मिताली , आणि उमा - आम्ही तिघींनी " गजर ने किया है इशारा ' हे गाणं - तेही बाळबोध ,  साड्या बिड्या नेसून म्हटल !  गाणं बर झाल  खरं , पण मला ते कधीच फारस आवडलं नाही . ( ही वेशभूषाही seniors चीच idea होती का ? )

Guardian Teacher - ही नवी संकल्पना त्यावर्षी सुरु झाली होती आमच्या college मध्ये ( medical college मधल्या मुलांना फार दडपण येतं - मग त्यांना , त्यांच्या समस्यांबद्दल  बोलण्यासाठी , प्रत्येक batch ला एक शिक्षक नेमले होते . आमच्यासाठी होत्या डॉ. पंतवैद्य - ( त्या  Anesthesiology च्या professor होत्या ) . आमच्यापैकी कोणीच त्यांच्याकडे कसल्याही समस्या घेउन गेलं नाही ! पण त्यांनी आम्हाला गुरुकृपा मध्ये पाणीपुरी आणि मग  Black Current icecream  खायला ( कुठे ते आठवत नाही ) नेल. माझ्यापुरत बोलायचं तर मी हे दोन्ही प्रकार पहिल्यांदाच खाल्ले .  पण त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिल नाहीये ! त्यामुळे आजच्या  माझ्या स्वरूपाचं श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही !  जाता येतं आम्ही चालत जायचो - सायन हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून आत जायचो - जाता येता खादाडी करायचो !

पहिल्या वर्षीच्या परीक्षेचं सेन्टर वडाळ्याला होता ( कॉलेजच नाव काय बर होत ? ) येताना आई न्यायला यायची - प्रचंड गर्दी गाडीत - कारण ती ऐन गर्दीची वेळ  - जीव मुठीत धरून चढायचो . practicals मुळीच आठवत नाहीत. ही कहाणी ऑगस्ट ९० -डिसेंबर ९१ पर्यंतची .


अशा रीतीने पहिल्या वर्षीची कहाणी सुफळ संपूर्ण जहाली !




आठवणी-३

पहिल्या वर्षीचा दुसरा विषय म्हणजे Anatomy.

Anatomy मध्ये अनेक भाग होते- त्यातला एक भाग म्हणजे dissection . खरं म्हणजे तो एक  प्रचंड धक्काच असतो आपल्या senses ना ! ती अंधारी dissection room , तिथे पसरलेला तो विचित्र वास ,( जो फोर्मालीन चा  होता )आणि विविध आकार आणि रंगांचे मृतदेह. पहिले काही दिवस कोणालाही जेवणच जायच नाही - कितीही धुतले तरी हातांचा तो वास ….दरवळत राहायचा ! माझं पहिल dissection हे lower /inferior extremity  ( Infex )अर्थात  पायाचं होतं.माझ्या वाट्याला एक अतिशय लठ्ठ बाई आली होती- जिच्या अंगावर एवढी चरबी होती की त्यातून एखादी nerve किंवा blood vessel शोधण फार म्हणजे फारच कठीण काम !  त्यातून आत्तापर्यंत  सर्व काही “ शिकवले  तरच समजते “ही पक्की खात्री ! त्यामुळे कोणी शिकवणार नाही म्हणजे अतिशय हेल्पलेस वाटायच ! स्व अभ्यास ही संकल्पना डोक्यातही आली नव्हती. dissection हा प्रकार ( Cunningham नावाचा खरं तर खूप चांगल पण त्यावेळी फ्रेंच-ग्रीक  वाटणारं ) textbook वाचूनच करायचा ही teachers ची पक्की समजूत झाली होती..

शिक्षकही थोडे दिव्य होते- अगम्य उच्चार , दुर्बोध शिकवणं, अचाट इंग्रजी आणि तोंडात सतत सिगारेट ! Infex मला कधीही नीट समजलं नाही ! पुढे पुढे मात्र  “ चौरसिया” नावाच आपल्या मातीतल पुस्तक मिळाल ( जे अक्षरशः एखाद्या गाईड प्रमाणे होतं ) आणि पास होण्यापुरत anatomy यायला लागलं ! सर्वच विषयांची भारतीय पुस्तक मिळाल्याने आम्हा students ची थोडीफार सोय झाली !

superior extremity ( supex) म्हणजेच हात - या dissection ला मात्र चांगले शिक्षक मिळाले, कोणीतरी surgeon होते- नाव आठवत नाही आता-पण आपल्यालाही समजू शकतं असा वाटायला लागलं.thorax ( chest) ला डॉ. शेजवलकर होत्या -त्या lectures मध्ये Genetics शिकवायच्या.- त्यांचाही शिकवणं समाजत असे मला…..थोड्या कापऱ्या- रडक्या आवाजात गाणं म्हणणाऱ्या ( पण त्या सुरात गायच्या एवढा नक्की ! ) -त्यांनी मला एकदा dissection नंतर गाणं म्हणायला लावलेला आठवतंय .( तेव्हा मला गायचा अजिबात confidence नव्हता-मी चांगली गाते असा मला मुळीच वाटायच नाही ! ) त्या स्वतःही एका LTMMC Day ला गायल्या होत्या - ( जिया ले गयो जी मोरा)

पहिल्या भागाला आलेल्या अगम्य शिक्षकांनी मला बराचसा dissection शिकवल( किंवा नाही शिकवलं ! ) त्यामुळेच हा BMR ( basic में राडा ) नावाचा रोग माझ्या वाट्याला आला अशी माझी पक्की खात्री आहे ! ( आता बोलायला काय जातंय ! )

Anatomy साठी आम्हाला Bone set अर्थात हाडांचा सापळा घ्यावा लागे.-तो एक स्वतंत्र अभ्यासच होता- ती हाड शरीरात कशी असतात त्याप्रमाणे धरून दाखवा -अर्थात anatomical position हा प्रत्येक viva मध्ये ठरलेला प्रश्न - ज्याच उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगळ द्यायचा ( अर्थात ह्यातही हुशार मुलांच exception होतच ) माणसामाणसामधील वैविध्याचा तो आम्ही घेतलेला मागोवा होता ! ( आमच्या परीने ! ) ट्रेन मध्ये , गर्दीत,ती हाडं हळूच काढून आम्ही अभ्यास करण्याचा नाटक करत इतर प्रवाशांना घाबरवलेल आहे !

Train वरून आठवलं- ट्रेन सुरु झाली की मी नेहमी गाढ झोपून जायचे-आणि उरलेली झोप वर्गात पूर्ण करायचे ! अगदी थोडी हवा जरी लागली तरी डोळे मिटण्याची ती सवय अजूनही कायम आहे !


आठवणी २

1st MBBS मध्ये रेश्माच्या बाबांनी आमचा संसार थाटायला मदत केली.ती माझी पहिली ( आणि शेवटचीही )रूममेट .आमच्या खोल्या खरं तर अतिशय भयाण होत्या.toilet बाथरूममध्ये कबुतरं फडफडत असायची.घाण करायची.छपर गळायच पावसाळ्यात , तुटक्या खिडक्यातून आत येणारी धुळच धूळ! सोबतीला उंदीर! छपरसुद्धा बाबा आदमच्या जमान्यातली ! काही केल्या पंख्याचा वारा काही लागायचा नाही.छतावरच्या सळ्यावरून धावणाऱ्या उंदरांची खुडबुड रात्री अपरात्री जाग आणायची.कसे राहायचो आम्ही तिथे देवालाच ठाउक  ?

दर बुधवारी आणि शनिवारी मी घरी पळायचे-धुवायच्या कपड्यांचा ढीग घेऊन ! मला खूप होमसिक वाटायच .तसा रोज दुपारी घरून डबा यायचा..ज्यात आईच्या छोट्या छोट्या चिट्ठया असायच्या...मी बरीच वर्ष त्या सांभाळून ठेवल्या होत्या.परत येताना तसेच धुतलेले कपडे bag मध्ये टाकून यायचे- दाराबाहेरच एक इस्त्रीवाला  उर्फ Ironman होता ( तो लक्षात राहण्याचा कारण म्हणजे एका Hostel Nite नंतर तो “ आपका neck बहुत अच्छा है “ असा म्हणाला - खूप हसू आलेल मला- माझ्या गात्या गळ्याऐवजी त्याने माझ्या मानेला compliment दिली ! )
१ st MBBS ला दाभोलकर “गुरुजी” होते ...गुरुजी म्हणायचं कारण - त्यांच्या period ला roll number प्रमाणे बसावे लागे….college मधून पुन्हा शाळेत आलो असा वाटायला लागलं मला तेव्हा !पहिल्याच दिवशी stage वर जाऊन स्वतःचा नाव ( आणि काय ? college ? मार्क ? ) माईक वरून सांगावं लागलं. दाभोळकर सर उर्फ Dobby ( आता त्यांना Dobby म्हणायला कसतरीच वाटत !)सर्वांना नावाने ओळखायचे . ८ वाजता  sharp ,lecture hall ची  दार  बंद व्हायची आणि उशिरा येणारे सरळ  गैरहजर ठरायचे.आता वाटत की ही शिस्त जरुरी होती...शेवटी आम्ही डॉक्टर होणार होतो..बेशिस्त वागून कसे चालणार होते ?

त्यांचा period ला मला मात्र कायम झोपच यायची ( अजूनही कुठल्याही lecture ला १० मिनिटांच्या वर डोळे उघडे राहत नाहीत माझे !) ते खरं तर न शिकवता direct dictate करायचे. त्यांच्या notes बहुतेक चांगल्या असतीलही पण मी कायम textbook च ( Guyton )वापरले. मधेच प्रश्नही विचारायचे ते- मलाही एकदा जांभया देताना प्रश्न विचारून खाड्कन जाग केलय त्यांनी ! ( पण उत्तर मात्र देऊ शकले नव्हते मी ) ... 1 st MBBS म्हटल की गुरुवर्य दाभोळकरच आठवतात आधी .

त्यांच्या lecture ला उशीर होऊ नये म्हणून आम्ही 7:05 ची ठाणा local पकडायला धडपडायचो.( हे hostel मिळायच्या आधी ) एकदा तर मी धावती local पकडली होती…( त्याच local मध्ये Anatomy चा एक नवा lecturer (? Dr दळवी) होता...आणि “ ही काय विचित्र मुलगी ?” अशा नजरेने माझ्याकडे बघत असल्याचा अंधुकस आठवतंय. त्यांच्या विषयाच्या दर आठवड्याला tests व्हायच्या आणि कमी मार्क मिळाले की शिक्षा ! ( म्हणजे group tutorials) तशा फारशा आठवणी नाहीत त्यांच्या period बद्दल ( फक्त एका मुलीला  त्यांच्या period मध्ये उलटीचा त्रास झाला होता आणि त्यामुळे बंद दार काही वेळासाठी उघडली होती ) फक्त एक impression मात्र आहे- शांत , धीरगंभीर आवाजात बोलणारे सर…एकंदरीत physio हा शाळेचाच एक भाग आहे अशी माझी खात्री झाली होती.

पुढे पुढे मला physiology फार आवडायला लागलं.विशेषतः डॉ मालती शिकवायला लागल्यावर तर अधिकच ..अजूनही एक south Indian शिक्षिका होत्या ( नाव विसरले ) ज्या G.I.T. physiology शिकवायच्या..त्याही खूप छान होत्या.

त्या वर्षी Guyton चा “ धोंडा “ घेऊन मी गोव्याला गेले होते...परीक्षा होती मे च्या सुटीनंतर -पण अभ्यास काहीच केला नाही-जो केला तो समजला नाही-आणि जो समजला तो लक्षात राहिला नाही..थोडक्यात काय तर मजेच्या वेळी उगाच अभ्यासाचा आव आणू नये ! काहीही फायदा होत नसतो !

आठवणी- १

2५ एक  वर्ष झाली असतील मला , diary लिहायला सुरुवात करून. आधी तर बरीचशी पाने कोरी  असायची-दर वर्षी १ जानेवारीला उत्साहाने सुरवात आणि मग हळू हळू ढेपाळत जायचे .नोंदीसुद्धा अगदी विनोदी “ सकाळी उठले. दुध प्यायले.करमचंद पहिले- छान होते “वगैरे वगैरे.कधीतरी शाळेतली भांडणं सुद्धा “ नीलमला ओरबाडले.मग वाईट वाटले.रडले" अशा हास्यास्पद गोष्टी !कधी मिळालेले मार्क, कधीतरी बघितलेले सिनेमे आणि serials. अगदी बारावी होईपर्यंत माझ्या नोंदी तुटक तुटक असायच्या.

मग पुढे MBBS ला प्रवेश मिळाला.- ती पाच वर्ष मी काहीच लिहिलं नाही.खरं तर ते दिवस अत्यंत सुंदर होते - पहिल्यांदाच stage वर  गायला लागले ,फार छान मित्र मैत्रिणी मिळाले , थोडा फार ड्रेस सेन्स  सुधारला(-मैत्रीणीमुळे अर्थातच ! ) आणि हळू हळू- वर्षभराने का होईना -काय शिकवतात ते कळायला लागले. मी चक्क doctor झाले !!

इंटर्नशिप चा काळ अजूनच मजेदार - आम्हाला त्या Dr. Reddy नी फसवलेच ! ( Reddy च होत न त्यांच नाव ?) एकाच batch मध्ये ठेवतो म्हणून आमच्यातल्या अर्ध्या जणांना वेगळ केलं. तरीही खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी ! २-३ trips झाल्या- बरेच movies झाले -एक  strike सुद्धा झाला मुलुंड ला असताना  !

१ ल्या वर्षीच्या आठवणी - किमान पहिल्या सहा महिन्यांच्या तरी - फारशा रंजक नाहीत. तेव्हा अभ्यास समजत नव्हता , राहायला जुन्या होस्टेलच्या barracks होत्या. ठाण्याच्या आम्ही ४ मुली - मी -रेश्मा आणि माधुरी-मिताली.माधुरीशी माझी ओळख झाली ती मी sion हॉस्पिटल ला फी भरायला आले तेव्हा -मी तशी कोणाशीही आपणहून बोलायला जाणार्यांपैकी नव्हते- माधुरी मात्र स्वत:हून ओळख करून घ्यायला आली.

थोड जास्तच  पुढे गेले मी- त्याआधी interviews बद्दल -तो दिवस  बऱ्यापैकी आठवतोय. नायर हॉस्पिटलच्या auditorium  मध्ये आमचे interviews होते  -अपर्णा बुधुगुरू ( सर्व उकारांच नाव !) जी त्या दिवशीची पहिली candidateहोती - ती येऊन आपल्या आईला म्हणाली ( थोड्या  निराशेतच )” सायन मिळाल “PCB मध्ये ९५ च्या वर मार्क असलेल्या मुलांची अपेक्षा होती की  आपल्याला G.S. मेडिकल मिळाव - ते अगदी top choice  होतं. मी मात्र आपल्याला admission मिळाल्याच्या खुशीत होते.

आणि अशा रीतीने मी sion ला गेले! माधुरी मिताली शी ओळख झाली  and we became very close friends  for next 5 years. Off course ,now, for many years I haven’t been in touch with them. But with whatsapp we have reconnected.

.....आणि अशा या आठवणीना उजाळा देण्यास निमित्त म्हणजे एक जुनी diary सापडली मला -एका पावसाळी दुपारी...काहीही उद्योग नव्हता तेव्हा खरडलेली ही काही पाने-पुन्हा पुन्हा वाचायलाही खूप मजा येतेय !

भेटूच पुन्हा !


असंच काहीसं...उगीच...लिखाण

खूप दिवसांपासून मी ब्लॉगवर काहीच लिहिलं नाहीये , हा विचार मनाला बराच त्रास देत होता . हा ब्लॉग सुरु करताना माझा मुख्य हेतू मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणे हा होता , जेणेकरून माझ वाचन सर्वंकष आणि शिस्तबद्ध होईल . मग हळूहळू इतर विषयही हाताळू शकेन अस वाटलं  म्हणून ते Certain other things !


कोण म्हणता लिखाण नेहमी profound हव …..कधीतरी ते मनाचा फेरफटका अशा स्वरुपातीलही असू शकतच की  !  ती गुळगुळीत , रंगीत पानांची इंग्रजी मासिके पहा - खरं तर त्यातील जाहिरातीच अधिक माहिती देणाऱ्या असतात …. बाकी असच ….ramblings !


मला अस नेहमीच वाटत , की , लिहिण्यासाठी , या सिद्धहस्त लेखकांना इतके नवनवीन विषय कुठून मिळतात …..माझं या प्रश्नापाशी येऊन  , घोडं अडतं , नेहमीच….


आता  , मला सर्व प्रश्नांची उत्तरं पुस्तकांत शोधायची सवय ! मग मी लिखाणावर मार्गदर्शक अशी पुस्तकं शोधू लागले …..सुदैवाने ती माझ्या कपाटातच होती…( म्हणजे मी नेहमीप्रमाणे विकत घेऊन ठेवली होती आणि साफ विसरून गेले होते ! )


‘ Writing down bones within  ‘ - Natalie Goldberg  हे ते पुस्तक...जे मी आजच वाचायला  घेतलंय…...त्या अनुषंगाने मनात आलेले काही मुक्तछन्दातले विचार …..( पण गद्यच !  )


सारखे Dazzling , brilliant , विषय काही मिळणार नाहीत….पण हरकत नाही...कुठचाही विषय घेऊन लिहायला सुरुवात केली पाहिजे….पण थोडक्यात...फाफटपसारा वाचायला वेळ कोणाला आहे हल्ली ? मात्र लिखाण interesting , flowing and  थोडंफार humorous  असेल तर मस्त  !


प्रत्येकाच्या लिखाणात  स्वतःचा  थोडाफार तरी अंश असतो - त्यामुळे  आपलं अनुभव विश्व समृद्ध हव - त्यासाठी चांगल ऐकणं , वाचण आणि पाहणं , तसच नवनवीन लोकांना भेटणंही अत्यंत महत्वाचं .


लिहिण्यासाठी बाहेर आणि ( मनाच्या ) आत शांतता हवी…..


वह्या कसल्या वापराव्यात ?  - तर चांगल्या , पण तरीही , साध्या - कारण खास ठेवणीतल्या वह्यावर फक्त खास , अगदी उत्तम लिखाण करावस वाटतं - त्यामुळे ते उमटत नसेल तर त्या कोऱ्याच राहतात !


सर्वात महत्वाचं आहे ते सातत्य - रोज किमान दहा मिनिटे तरी लिहिणे - आणि फक्त लिहिणे - मग कसलही editing , punctuation , grammar , spelling काहीही बघायचं नाही….हे लिखाण फक्त आपल्या अंतर्मनातील सृजनशीलतेला जागवण्यासाठी - हे काही आपण कोणाला दाखवायची गरज नाही ...हो...यातून कधीतरी काही उत्तम idea मिळून जाईलही !  ह्याला म्हणतात Timed writing … ( हे लेखन त्यातूनच आलय ! )


हीच concept मागे Julia Cameron नावाच्या लेखिकेच्या पुस्तकातही वाचली होती….मोर्निंग  pages  या नावाने...म्हणजे सकाळी उठून , इतर काहीही करायच्या आधी , लिहित सुटणे...तीन पूर्ण पान भरेपर्यंत !


आज एवढच वाचलंय आणि अमलातही आणायचा प्रयत्न करतेय ! तसा हे abstract लिखाण झाल...त्यामुळे हे publish करण्याजोग आहे का माहित नाही ! पण असं कुठे म्हटलंय कि फक्त रेखीव , कोरीव आणि कातीव लिखाण प्रसिद्ध कराव ? त्यामुळेच…..

चालत राहा…...

चालायला तर लाग तू ….

वाट सापडेलच हळूहळू -

उजेडही होईल …...

जरी आता अंधार असला तरी ,

  • कारण सूर्य या अंधाराच्या पलीकडेच आहे …..

वाट बघत थांबलाय  ,  

तुझी -

घाबरलीस ?

ही तर झाडं आहेत …..

राक्षस नाहीत ,

सावल्या आहेत …..

ज्या सोबतच करतात….. उजेडी …..

- आणि थोड चाललीस ,

तर जंगल संपेल -

मग -

फुलांच शेत ,

पहाट वाऱ्यावर  डोलणारी फुलं …..

तुलाही वाटेल -

नाचावं …..

या फुलांसोबत …..

कारण ….पहाट झालीये ……

आणि हो ,

इथेच बसून राहिलीस ,

तर पहाट  होईल आपल्या वेळी …..

पण तुझ्यापर्यंत पोचणार नाही ……

चाललीस तर ……

रंग , गंध , स्पर्श , उजेड …..

थोडक्यात ….स्वर्ग ……

फक्त चार पावलांवर …….

उठ …..

चल……

थांबू नकोस …..

वळू नकोस ……

पावलापुढे पाउल ……

टाकत राहा ……..

चालत राहा……

चालत राहा…...